16.2 C
Latur
Tuesday, December 2, 2025
Homeमहाराष्ट्रनिवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

हर्षवर्धन सपकाळ संतापले

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील २४६ नगरपालिका ४२ नगरपंचायतींचे मतदान एक दिवसावर आले असताना २० नगरपालिका व काही प्रभागांमधील निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय अनाकलनीय आहे. कोर्टाच्या निकालाने या निवडणुका पुढे ढकलल्या असे जर सांगितले जात असेल, तर हा निकाल २२ नोव्हेंबरला आला होता मग ३० नोव्हेंबरपर्यंत म्हणजे ८ दिवस निवडणूक आयोग काय झोपा काढत होते काय? असा संतप्त सवाल करून निवडणूक आयोग स्वत:चे नियम पाळू शकत नाही. आयोगाचा भोंगळ कारभार सुरू आहे, असा घणाघाती आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या एक दिवस आधी काही नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळपास १० वर्षानंतर होत आहेत. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात मात्र त्यातही गोंधळ निर्माण करण्यात आला. आधी अर्ज भरण्याची प्रक्रिया किचकट केली, मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ करण्यात आले. दुबार/तिबार नावे मतदार यादीत दाखवली, निवडणुका जाहीर झाल्यानंतर आरक्षणाच्या मुद्द्यावर कोर्टाने निर्देश दिल्याने अनेक नगरपंचायतीमधील भवितव्य टांगणीला लागले आहे, असे यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले.

तसेच, आता तर २० नगरपालिका व काही प्रभागांमधील निवडणुका स्थगित करून त्यांचा नवीन कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ३ तारखेच्या निकालाचा या निवडणुकावर परिणाम होऊ शकतो त्यामुळे ३ तारखेचा निकालही २० तारखेच्या मतदानानंतरच जाहीर करावा. आपलेच नियमही आयोगाला पाळता येत नाहीत हा कसला आयोग? निवडणुका या निष्पक्ष, पारदर्शक पद्धतीने पार पाडणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्यच आहे पण निवडणूक आयोगाचा मागील काही वर्षांतील कारभार पाहता आयोगाला निवडणुकाही व्यवस्थित घेता येत नाहीत, हे खेदाने म्हणावे लागते, असे म्हणत सपकाळांनी संताप व्यक्त केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR