सोलापूर : प्रतिनिधी
पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी रोज हजारो भाविक येतात. अनेक भाविक दर्शनापूर्वी चंद्रभागा नदीत जाऊन स्नान करतात. चंद्रभागा नदीत उजनी धरणातून पाणी सोडले आहे. यामुळे नदीच्या पात्रात पाणी मोठ्या प्रमाणावर आहे. नदीच्या पात्रात स्नानासाठी गेलेल्या तीन महिला भाविकांचा शनिवारी सकाळी बुडून मृत्यू झाला आहे. त्यातील दोन महिलांचे मृतदेह सापडले आहेत. तिस-या महिलेचा शोध सुरू आहे. उजनी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे सध्या चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे. भाविकांना पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडली आहे.
विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या तीन महिला भाविक शनिवारी सकाळी चंद्रभागेत स्नानासाठी उतरल्या होत्या. जालना जिल्ह्यातील भोकरधन येथे राहणा-या दोन महिला आणि एक अनोळखी महिला नदीत उतरली. त्या महिलांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे चंद्रभागेत त्या बुडाल्या. पुंडलिक मंदिराजवळ ही घटना घडली. त्या महिला पाण्यात बुडत असल्याचे इतर महिलांच्या लक्षात आले. त्यामुळे मदतीसाठी आरडाओरड सुरू केली.
दोन्ही महिला जालना जिल्ह्यातील
धरणातून पाणी सोडल्यामुळे नदीतील पाण्याचा प्रवाह वेगाने सुरू आहे. या प्रवाहात तिन्ही महिला बुडाल्या. त्यात सुनीता सपकाळ (वय ४३) आणि संगीता सपकाळ (वय ४०) या दोन महिला जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील आहेत. तसेच एका महिलेची ओळख पटली नाही. चंद्रभागा नदीवर असलेल्या कोळी बांधवांनी या बुडालेल्या महिलांचे मृतदेह बाहेर काढले. तिस-या महिलेचा शोध सुरू आहे. घटनास्थळी बचाव पथकही आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.