पुणे : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास आणि लातूरचे सुपुत्र अभिनेते-दिग्दर्शक रितेश विलासराव देशमुख यांच्या कल्पनेतून साकारलेला ‘राजा शिवाजी’ चित्रपट सध्या सिनेरसिकांच्या मनावर राज्य करत आहे. याच चित्रपटाचा विशेष आनंद घेण्यासाठी पुण्यात स्थायिक झालेल्या लातूरकरांनी रविवारी एकत्र येत एकच गर्दी केली होती. निमित्त होते ‘डी आर इव्हेंट इंडिया’ आणि ‘समस्त पुण्यातील लातूरकर फाउंडेशन’ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या खास स्क्रीनिंगचे.
चित्रपटाचे लेखक अजित वाडीकर, संदीप पाटील, इतिहास संशोधक केतन पुरी आणि अभिनेता कपिल होनराव यांनी या सोहळ्याला खास हजेरी लावली होती. चित्रपट पाहताना लातूरकर प्रेक्षक भारावून गेले होते. ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने संपूर्ण चित्रपटगृह दुमदुमून गेले होते. लातूरचा कलाकार, लातूरचे दिग्दर्शन आणि प्रेक्षकही लातूरकरच असल्याने या कार्यक्रमाला एका कौटुंबिक उत्सवाचे स्वरूप आले होते. हा केवळ चित्रपट पाहण्याचा कार्यक्रम नव्हता, तर सातासमुद्रापार आणि घराबाहेर असलेल्या लातूरकरांनी आपल्या माणसाचा आणि कलेचा गौरव करण्यासाठी एकत्र येण्याचा एक भावनिक सोहळा होता.
रितेश-जेनेलिया यांच्या कामाचे कौतुक
रितेश देशमुख यांचे दिग्दर्शन आणि जेनेलिया देशमुख यांची निर्मिती असलेल्या या भव्य कलाकृतीचे प्रेक्षकांनी तोंडभरून कौतुक केले. आपल्या लातूरच्या सुपुत्राने छत्रपती शिवरायांचा इतिहास इतक्या ताकदीने मांडल्याबद्दल सर्व उपस्थितांनी अभिमान व्यक्त केला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डी आर इव्हेंट इंडिया आणि समस्त पुण्यातील लातूरकर फाउंडेशनच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. या स्क्रीनिंगमुळे पुण्यातील लातूरकरांमध्ये पुन्हा एकदा एकी आणि जिव्हाळ्याचे नाते पाहायला मिळाले.
















