नागपूर : प्रतिनिधी
राज्यात अनेक ठिकाणी महसुली नाल्यांवर अतिक्रमण झाले आहे. यासंदर्भात राज्यभर विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. नागपुरात ते मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राज्यातील महसुली नाले, पाणंद रस्ते आणि शेतक-यांच्या वाहतुकीचे मार्ग पूर्ववत करणे हे महसूल विभागाचे मूलभूत कर्तव्य आहे. महसुली नाल्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरण केल्यास पाण्याचा निचरा सुरळीत होईल, पूरस्थिती टळेल आणि शेतक-यांना मोठा दिलासा मिळेल, असे ते म्हणाले.
सबसिडीतील सवलतींबाबतदेखील त्यांनी भाष्य केले. काही वेळा सवलती कमी झाल्याचे दिसून येते; मात्र परिस्थिती स्थिर झाल्यानंतर त्या पूर्ववत होतात. कोरोनाच्या काळातही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती आणि नंतर ती सामान्य झाली होती. आताही काही काळ प्रतीक्षा करावी लागेल, असे ते म्हणाले. महायुतीतील अर्थखात्याच्या वाटपाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि महायुतीचे वरिष्ठ नेते एकत्र बसून योग्य निर्णय घेतील. कोणत्याही घटक पक्षावर अन्याय होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई-गोव्याला जाणा-या नगरसेवकांना पक्षाकडून मदत नाही
नागपूरचे सर्व नगरसेवक मुंबईला प्रशिक्षणाला जात आहेत व तेथून ते पर्यटनाला जाणार आहेत. यासाठी पक्षाकडून कुठलीही मदत करण्यात आलेली नाही. सर्व नगरसेवकांनी स्वत:च्या जवळील पैसे खर्च केले आहेत, असे बावनकुळे यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदींइतका कार्यकाळ कुणीच पूर्ण करणार नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाला १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. ते इतका वेळ कार्य करतील की त्यांच्या इतका पंतप्रधानपदाचा कार्यकाळ कुणीही पूर्ण करू शकणार नाही, असा दावा बावनकुळे यांनी केला.
















