शारजा : इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने आता आखाती देशांवरही हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. इराणने कतार आणि जॉर्डनसह दुबईमध्येही हल्ले केल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे भारतात येणारी अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली असून दुबईतील सर्व विमानतळ सध्या बंद ठेवण्यात आले आहेत. फ्लाईट कॅन्सल झाल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. मध्य प्रदेशातील अनेक नागरिक दुबई विमानतळावर अडकून पडले आहेत.
इस्रायल-इराण युद्धामुळे मध्य प्रदेशातील अनेक प्रवासी शारजाहमध्ये अडकले आहेत. यामध्ये प्रामुख्याने इंदूरमधील रहिवाशांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. शारजाहून इंदूरला येणारे एअर इंडिया एक्स्प्रेसची फ्लाईट कॅन्सल करण्यात आली आहे. यामुळे मध्य प्रदेशातील १०० हून अधिक प्रवासी दुबई आणि शारजाह विमानतळावर अडकले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, हे प्रवासी इंदूर, भोपाळ, ग्वाल्हेरसह राज्याच्या विविध जिल्ह्यांतील आहेत.
जीतू पटवारी यांचे पंतप्रधानांना आवाहन
मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जीतू पटवारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या नागरिकांच्या सुरक्षितेसाठी आवाहन केले आहे. इस्रायल-इराण युद्धाच्या परिस्थितीमुळे दुबई आणि शारजाह विमानतळावर मध्य प्रदेशातील १०० हून अधिक नागरिक अडकले आहेत. महिला, मुले आणि त्यांचे कुटुंबीय अनेक तासांपासून गैरसोयीचा सामना करत असून फ्लाईट कॅन्सल झाल्यामुळे त्यांची चिंता अधिक वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की, त्यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून सर्व भारतीयांची सुरक्षा सुनिश्चित करावी आणि त्यांना लवकरात लवकर स्वदेशी परत आणण्याची व्यवस्था करावी असे जीतू पटवारी यांनी म्हटले आहे.

