मणिपूरमध्ये वाहनावर अतिरेक्यांचा हल्ला
इम्फाळ : वृत्तसंस्था
मणिपूर राज्यातील विष्णूपूर जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी दहशतवाद्यांनी आसाम रायफल्सच्या वाहनावर हल्ला केला. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले तर, तीन जण जखमी झाले. ही घटना नांबोल सबल लेइकाई भागात सायंकाळी ६ वाजता घडली. आसाम रायफल्सचे जवान इम्फाळहून विष्णूपूरला निघाले होते. पोलीस आणि स्थानिक लोकांच्या मदतीनं जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या प्रकरणाची माहिती देताना वरिष्ठ सुरक्षा अधिका-यांनी म्हटले की मणिपूरच्या विष्णूपर जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात आसाम रायफल्सचे दोन जवान शहीद झाले आहेत. यामध्ये एक जेसीओ आणि एका जवानाचा समावेश आहे. आसाम रायफल्सच्या वाहनावर हल्ला केल्यानंतर दहशतवादी एका पांढ-या व्हॅनमधून पळून गेले. आसाम रायफल्सच्या जवानांनी संयमानं प्रत्युत्तराची कारवाई केली. यात सामान्य नागरिकांना इजा होऊ नये याची काळजी घेण्यात आली. सरक्षा दलांनी या दहशतवादी हल्ल्यातील हल्लेखोरांना पकडण्यासाठी अभियान सुरु केले आहे.
मणिपूरचे माजी मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी या घटनेचा निषेध केला आहे. ते म्हणाले की, आमच्या ३३ आसाम रायफल्सच्या बहादूर जवानांवरील हल्ला दु:खद आहे. दोन जवान शहीद झाले आणि इतर तिघे जखमी झाल्याने धक्का बसल्याचे बिरेन सिंह म्हणाले. शहीदांचे शौर्य आणि बलिदान नेहमी लक्षात ठेवले जाईल. गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळावी, असे बिरेन सिंह म्हणाले.
राज्यपालांकडून
घटनेचा निषेध
मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. राजभवनाकडून जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार आसाम रायफल्सचे दोन जवान देशाचं संरक्षण करताना शहीद झाले. राज्यपालांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केली आहे. जखमींची प्रकृती लवकर बरी व्हावी, अशी प्रार्थना करत असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय अशा भ्याड हल्ल्यांना सहन केले जाणार नाही, असेही सांगितले.
















