श्रीनगर : पंजाबनंतर जम्मू-काश्मीर अंमली पदार्थांचे नवीन केंद्र म्हणून समोर आले आहे. सरकारी अंदाजानुसार, राज्याच्या १.३ कोटी लोकसंख्येपैकी सुमारे १३.५ लाख लोक (१३% पेक्षा जास्त) अंमली पदार्थांच्या आहारी गेले आहेत. २०२२ मध्ये हा आकडा सुमारे ६ लाख होता.
अधिका-यांचे म्हणणे आहे की, दहशतवादासोबतच आता अंमली पदार्थांचे जाळे देखील मोठे आव्हान बनून उभे राहिले आहे. डीजीपी नलिन प्रभात यांनीही पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आणि अंमली पदार्थांच्या जाळ्याला मोठा धोका म्हटले आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने १०० दिवसांची नशा-विरोधी मोहीम सुरू केली आहे. यात आतापर्यंत १ कोटींहून अधिक लोक सहभागी झाले आहेत.
दक्षिण काश्मीरमधील मोहम्मद अमीन सांगतात की, त्यांचा मुलगा वकील बनू इच्छित होता, पण शाळेत सिगारेटपासून सुरू झालेले व्यसन हळूहळू चरस आणि हेरोईनपर्यंत पोहोचले. नंतर अंमली पदार्थ खरेदी करण्यासाठी त्याने घरातील वस्तू विकायला सुरुवात केली. अंमली पदार्थांच्या व्यसनातून बाहेर पडलेल्या आदिल भट यांचे म्हणणे आहे की, यामागे संघटित टोळ्या काम करत आहेत, ज्यांचे संबंध पंजाबमधील डीलर्सशी जोडलेले आहेत. अंमली पदार्थ सीमावर्ती भागातून जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचत आहेत.
१६५ हॉटस्पॉट चिन्हित, ७०४ एफआयआर
जागरूकता मोहिमेसोबत कायदा अंमलबजावणी करणा-या यंत्रणांनी ड्रग्ज नेटवर्कवर कारवाई तीव्र केली आहे. एनडीपीएस कायद्यांतर्गत ७०४ एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. प्रशासनाने १६५ अशा क्षेत्रांची ओळख केली आहे, जिथे अंमली पदार्थांचा व्यवसाय जास्त आहे, जेणेकरून तिथे विशेष पाळत ठेवता येईल.
















