नवी दिल्ली : या वर्षात आतापर्यंत भारतात २०४ वाघांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक ५२ वाघांचा मृत्यू झाला. यानंतर मध्य प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर असून येथे ४५ वाघांचा मृत्यू झाला आहे. २६ मृत्यूसह उत्तराखंड तिसऱ्या क्रमांकावर आहे. शिकार्यांनी ५५ वाघांचा वेगवेगळ्या कारणांनी बळी घेतला. प्रोजेक्ट टायगरला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, वाइल्डलाइफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडियाने (डब्लूपीएसआय) वाघांबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. अहवालानुसार, तामिळनाडू आणि केरळमध्ये प्रत्येकी १५ वाघांचा मृत्यू झाला.
अहवालानुसार, कर्नाटकात १३ वाघ, आसाम आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी १०, यूपीमध्ये ७, बिहार आणि छत्तीसगडमध्ये प्रत्येकी ३, ओडिशा आणि आंध्र प्रदेशमध्ये प्रत्येकी २ वाघांचा मृत्यू झाला. तेलंगणात यावर्षी फक्त एका वाघाचा मृत्यू झाला आहे. ऑल इंडिया टायगर एस्टिमेटच्या गणनेनुसार, २०१८ ते २०२२ दरम्यान देशातील वाघांच्या संख्येत २०० ने वाढ झाली आहे. २०२२ मध्ये भारतात वाघांची संख्या ३,१६७ होती, तर २०१८ मध्ये ती २,९६७ होती.

