यवतमाळ : प्रतिनिधी
सध्या राज्यात महिला अत्याचाराचे अनेक गुन्हे समोर येत आहेत. त्यातच आता यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव शहरातून तब्बल ३४ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मानवी तस्करी आणि अल्पवयीन मुली बेपत्ता होणे ही एक अत्यंत गंभीर आणि थरकाप उडवणारी घटना घडल्याचे समोर आले आहे. राळेगावातील जवळपास ३४ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या असून त्यांना परराज्यात देहव्यापारासाठी विकले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आमदार अशोक उईके आणि भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्लसिंह चौहान यांनी तातडीने पोलिस प्रशासनाची भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून भाजपचे सातत्याने या प्रकरणावर लक्ष होते. राळेगाव शहरात अल्पवयीन मुलींना बाहेर राज्यात विकणे आणि मानवी तस्करी यांसारखे गंभीर गुन्हे घडत आहेत. याबद्दल प्रशासनाने तातडीने दखल घेणे आवश्यक आहे, असे मत प्रफुल्लसिंह चौहान यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी पोलिस उपविभागीय अधिकारी बन्सल आणि स्थानिक पोलिस निरीक्षकांशी सविस्तर चर्चा करून या प्रकरणाशी संबंधित एक महत्त्वाची ऑडिओ क्लिप देखील पोलिसांकडे सुपुर्द केली आहे.
दोषींवर कठोर कारवाईचे आदेश
या प्रकरणाची तीव्रता पाहता मंत्र्यांनी स्वत: राळेगाव पोलिस स्टेशनला भेट देऊन प्रकरणाचा आढावा घेतला. या तपासात कोणतीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही, असा सल्ला अशोक उईके यांनी दिला. आरोपींना लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, पीडित मुलींचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणांनी अधिक गतीने काम करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
















