नवी दिल्ली : मध्य पूर्वेतील अत्यंत महत्त्वाच्या आणि मोक्याच्या मानल्या जाणा-या होर्मुज सामुद्रधुनीच्या मार्गावरील जहाजांच्या वाहतुकीबाबत भारताला दिलासा देणारी महत्त्वाची बातमी समोर आली आहेत. होर्मुज सामुद्रधुनीतून ६० मोठी व्यापारी जहाजे सुरक्षितपणे बाहेर पडली असून भारतापर्यंत पोहोचली आहेत. तसेच ३९७२ खलाशांना सुरक्षितपणे परत आणण्यात आले आहे.
संसदेतील एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्र सरकारने सांगितले की, आखाती प्रदेशातून ३,९७२ भारतीय खलाशांना परत आणण्यात आले, तर एका २४ तास कार्यरत असलेल्या संकट व्यवस्थापन प्रणालीने हजारो कॉल्स आणि ईमेल्स हाताळले. होर्मुजच्या सामुद्रधुनीतून ६० व्यापारी जहाजे बाहेर काढण्यात आली असून ती भारतात सुखरूप पोहोचली आहेत. सरकारने या मोहिमेसाठी विशेष योजना आखली होती. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी खलाशांना संपूर्ण प्रशिक्षण देण्यात आले होते.
मंत्रालयाने म्हटले आहे की, होर्मुजच्या सामुद्रधुनीतून होणा-या सागरी प्रवासाबाबत मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यात आली होती. त्यामुळे भारतीय प्रवशांना धोकादायक कामे करण्याबाबत दबाव नव्हता. संघर्षग्रस्त क्षेत्रांमध्ये, संबंधित खलाशाच्या संमतीने केवळ आपत्कालीन परिस्थितीतच कर्मचारी बदलास परवानगी आहे. स्थलांतर आणि मायदेशी परत आणण्याच्या कार्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी, एक समर्पित २४७७ नियंत्रण कक्ष आणि नौवहन महासंचालनालयाचे सागरी क्षेत्र जागरूकता केंद्र अहोरात्र कार्यरत आहेत. नियंत्रण कक्षाने खलाशी, त्यांचे कुटुंबीय आणि सागरी क्षेत्राशी संबंधित इतर लोकांकडून आलेले १५,७७१ फोन कॉल्स आणि ३६,४९९ ईमेल्स हाताळले आहेत. भारतीय खलाशांची नियुक्ती परवानाधारक भरती आणि नियुक्ती सेवा एजन्सी मार्फत केली जाते. प्रमाणित नियामक मंजुरीशिवाय कोणताही खलाशी इमिग्रेशन क्लिअरन्स पूर्ण करू शकत नाही.
देशात एलपीजीचा तुटवडा नाही
होर्मुज सामुद्रधुनी हा जगातील तेल आणि नैसर्गिक वायूच्या वाहतुकीसाठीचा अत्यंत संवेदनशील आणि प्रमुख मार्ग आहे. इराण संकटाच्या काळात शिवालिक, नंदा देवी, लाडकी, पाइन गॅस, जग वसंत, बीडब्ल्यूडी टेल, बीडब्ल्यूईएलएम आणि ग्रीन सान्वी ही जहाजे भारतात आणण्यात आली होती. या जहाजांमुळे देशातील एलपीजीचा तुटवडा कमी करण्यास मदत झाली.
















