कोलंबो : श्रीलंकेच्या प्रादेशिक जलक्षेत्रात मासेमारी केल्याच्या आरोपावरून श्रीलंकेच्या नौदलाने सात भारतीय मच्छिमारांना अटक केली आहे. मंगळवारी उत्तरेकडील जाफना द्वीपकल्पातील कोविलन भागात ही कारवाई करण्यात आली. मच्छिमारांना अटक करण्यासोबतच नौदलाने त्यांच्या दोन मासेमारी बोटी जप्त केले आहे.
श्रीलंकेच्या नौदलाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, कोविलनच्या समुद्रकिना-याजवळ गस्त घालत असताना भारतीय मच्छिमार श्रीलंकेच्या सीमेत मासेमारी करत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेले बोट आणि अटकेतील मच्छिमारांना पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी जाफना येथील मैलिडी येथील मत्स्यव्यवसाय निरीक्षकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
मच्छिमारांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
भारत आणि श्रीलंका यांच्यातील सागरी सीमेचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून भारतीय मच्छिमारांना अटक होण्याच्या घटना गेल्या काही काळापासून सातत्याने घडत आहेत. विशेषत: तामिळनाडूतील मच्छिमार पाक सामुद्रधुनी ओलांडून श्रीलंकेच्या हद्दीत जातात, असा आरोप श्रीलंकन नौदलाकडून वारंवार केला जातो.

