वारंगळ : तेलंगणा राज्यातील वारंगळ जिल्ह्यातून अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून खानपूर मंडळातील अशोक नगर भागात ८०० वर्षे जुने शिवमंदीर पाडण्यात आले. त्यानंतर नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली. एका सरकारी इंटिग्रेटेड स्कूलच्या बांधकामासाठी हे मंदिर पाडण्यात आल्याचे अधिका-यांनी सांगितले आहे. परंतु, हे मंदिर कोणतीही पूर्वपरवानगी न घेता पाडण्यात आल्याचा आरोप केला जात असून मंदिर त्याच ठिकाणी पुन्हा काकतीय स्थापत्यशैलीत बांधून मिळावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
हे मंदिर १३ व्या शतकातील काकतीय कालखंडातील असल्याचे सांगितले जाते. मंदिराच्या अवशेषांमध्ये फेब्रुवारी १२३१ मधील एक अत्यंत दुर्मिळ तेलुगू शिलालेख सापडला आहे. या शिलालेखात काकतीय राजा गणपतीदेव यांचा उल्लेख ‘महाराजा’ आणि ‘राजाधिराजुलू’ असा करण्यात आला आहे. हे मंदिर राज्याच्या पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येत असूनही, कोणतीही पूर्वपरवानगी न घेता ते पाडण्यात आल्याचा आरोप होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नियोजित शाळेच्या जागेचे सपाटीकरण करताना कंत्राटदाराने हे मंदिर पाडण्यात आले. या कारवाईदरम्यान मंदिराचा गाभाराही खोदण्यात आल्याचे समोर आले . ग्रामस्थांचा आरोप आहे की, पुरातत्व विभागाचे नियम धाब्यावर बसवून ही कारवाई करण्यात आली. एका वकिलाने केलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली जात आहे.
लोकप्रतिनिधी, अधिका-यांच्या भेटी
स्थानिक आमदार दोंथी माधव रेड्डी आणि जिल्हाधिकारी सत्या शारदा यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यांनी आश्वासन दिले आहे की, शाळेच्या बांधकामासोबतच शिवमंदिर देखील त्याच ठिकाणी बांधण्यात येईल. इतिहास तज्ज्ञांच्या मते, ज्या मंदिराला बांधायला अनेक वर्षे लागली, ते अवघ्या एका दिवसात पाडण्यात आले. शाळेच्या आवारात हे मंदिर वारसा म्हणून जतन करता आले असते, अशा शब्दांत त्यांनी खंत व्यक्त केली.
















