म्हैसूर : वृत्तसंस्था
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी कर्नाटकातील म्हैसूर येथे एका जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी मणिपूरमधील हिंसाचारावरून मोदींवर निशाणा साधला. पंतप्रधानांनी ४२ देशांचा दौरा केला आहे, परंतु एकदाही मणिपूरला गेले नाहीत असे खर्गे यांनी म्हटले आहे. मणिपूरमध्ये गेल्या एक वर्षापासून जातीय हिंसाचार आणि अस्थिरता पाहायला मिळत आहे, ज्यावर विरोधी पक्ष सातत्याने केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत आहेत.
देशाच्या ईशान्येकडील राज्य मणिपूर एका वर्षापेक्षा जास्त काळ हिंसाचाराचा सामना करत आहे, परंतु पंतप्रधानांना तिथे जाऊन लोकांचे दु:ख समजून घेण्याची आवश्यकता वाटत नाही. ४२ देश फिरून आले, पण मणिपूरला भेट देणे गरजेचं वाटलं नाही. मणिपूर भारताचा भाग नाही का? असे म्हणत खर्गेंनी खोचक सवाल विचारला आहे.
खर्गे यांनी काँग्रेस आणि भाजपाची तुलना करत म्हटले की, काँग्रेस पक्षात लोक काम करतात, तर मोदींच्या भाजपामध्ये लोक फक्त बोलतात. काँग्रेसने नेहमीच लोकांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले आहे आणि विकासाला केंद्रस्थानी ठेवले आहे. भाजपा म्हणते की, कर्नाटक सरकार कंगाल झाले आहे, परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे. सिद्धरामय्या सरकार राज्याला चांगल्या दिशेने घेऊन जात आहे आणि भाजपाचा हा आरोप निराधार आहे.