बारामती : प्रतिनिधी
राज्यात एकीकडे ऐन पेरणीच्या तोंडावर डिझेल-पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतक-यांची मशागतीची कामे खोळंबली आहेत, तर दुसरीकडे कष्टाने पिकवलेला कांदा विकल्यानंतर शेतक-यालाच स्वत:च्या खिशातून पैसे भरावे लागत आहेत. पेपरफुटी, महागाई, इंधन टंचाई आणि महिला अत्याचार अशी सर्वत्र विचित्र परिस्थिती असून काहीही आलबेल नाही. केंद्र तसेच राज्य सरकारची असंवेदनशीलता बघता ‘रोम जळत असताना बासरी वाजवत बसलेल्या निरो’ची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
रोहित पवार म्हणाले की, डिझेल-पेट्रोलचा वरूनच पुरवठा होत नसल्याने पेट्रोल पंपांवर शेतक-यांना डिझेल मिळत नाही, परिणामी ऐन पेरणीच्या तोंडावर मशागतीची कामे खोळंबली आहेत. जळगाव जिल्ह्यात पूर्णत: इंधन साठा संपल्याने पंपांवर रात्रीपासून मोठ्या रांगा लागल्या आहेत.
रोहित पवार म्हणाले की, शेतकरी बाजारात कांदा घेऊन जातो १२ क्विंटल ८७ किलो… कांद्याचे १४८६ रुपये मिळतात, त्यातून हमाली, तोलाई, गाडी भाडे असे एकूण १७६९ रुपये गेले तर उरले किती?… ३०१ रुपये शेतक-याला स्वत:च्या खिशातून भरावे लागले. ही आहे कांदा उत्पादक शेतक-याची वस्तुस्थिती.. आता सरकारनेच सांगावं कांदा उत्पादकाने जगायचं कसं? अशा लाखो कांदा उत्पादकांच्या हक्कासाठी या झोपलेल्या सरकारला वठणीवर आणून कांदा उत्पादकांचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी परवा मंगळवार, दि. २६ मे २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता चांदवड चौफुली येथे शेतकरी मोर्चात सहभागी व्हा! मी पण येतोय तुम्ही पण या…!
लोकप्रतिनिधीची लवकरच चौकशी होईल
रोहित पवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणा-या, कॉ. स्व. गोविंद पानसरे सरांच्या हत्येचे समर्थन करणा-या, प्रकाशक प्रशांत आंबी यांना अश्लाघ्य शिवीगाळ करणा-या, महिलांचा अवमान करणा-या लोकप्रतिनिधीच्या चौकशीसाठी अखेर कोल्हापूर न्यायालयाने परवानगी दिली असून, लवकरच ही चौकशी होईल, अशी अपेक्षा!
















