मुंबई : लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातून निवडून आलेले ४८ खासदार आता दिल्ली दरबारी आपला आवाज बुलंद करणार आहेत. ४८ पैकी ३० जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत तर महायुतीचे १७ उमेदवार विजयी झाले आहेत. सांगलीतून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी विजय मिळवला असून काँग्रेसला पाठिंबाही जाहीर केला. दरम्यान, नवनिर्वाचित ४८ पैकी ७ विद्यमान आमदार आहेत. आता त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे.
त्यापैकी २ विधानसभा आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा दिला. त्यामध्ये काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे व बळवंत वानखेडे यांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा दिला. अद्याप आमदार रविंद्र वायकर, वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर व मंत्री संदीपान भुमरे यांच्या राजीनाम्याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे उर्वरित ५ आमदारही लवकरच राजीनामा देतील, असे सांगितले जात आहे. खासदार झाल्याने राज्यातील ७ विद्यमान आमदारांना २० जूनपर्यंत आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे.