सुपौल : बिहारच्या सुपौल जिल्ह्यातील ७५ वर्षीय मोहन मंडल गावात वृद्धांच्या एका गटाचा भाग आहेत. यात समवयस्क सहकारी एकमेकांची काळजी घेतात व सरकारी योजनांशी जोडण्यासाठी मदत करतात. मोहन यांनाही एका सहका-याने ‘वय वंदना कार्ड’ बनवण्यासाठी प्रेरित केले. त्यावेळी त्यांना हे कार्ड कधीतरी आपला जीव वाचवेल, अशी कल्पनाही नव्हती. काही दिवसांनंतरच मोहन यांना ब्रेन स्ट्रोक आला.
उपचाराचा खर्च लाखो रुपये होता. मग गावच्या ग्रुपने कुटुंबाला योजनेत समाविष्ट रुग्णालयापर्यंत पोहोचवले. तिथे त्यांची शस्त्रक्रिया झाली. तीन लाख खर्च झाले. आज मोहन निरोगी आहेत. आता इतर वृद्धांनाही गरजेच्या खर्चासाठी तयार राहण्यास प्रेरित करतात. यूएन पॉप्युलेशन अवॉर्डने सन्मानित हेल्पएज इंडियाने त्सुनामीनंतर अशा गटांचा पाया रचला होता. आज मोहन यांच्यासारखे ४२ हजार वृद्ध देशभरातील ९ राज्यांतील ३ हजार ग्रुप्सशी जोडले गेले आहेत.
एकमेकांच्या मदतीचे व्यासपीठ
वर्ष २००४ मधील त्सुनामीने प्रभावित वृद्धांसाठी २००५ मध्ये चेन्नईत पहिला एल्डर सेल्फ हेल्प ग्रुप बनला. त्यानंतर देशभरात सुरू करण्यात आला. एका ग्रुपमध्ये ५५ वर्षे किंवा अधिक वयाचे १०-२० वृद्ध असतात. संस्था गावांमध्ये जाऊन अशा लोकांची ओळख पटवते. ते आर्थिक, सामाजिक किंवा आरोग्याशी संबंधित अडचणींचा सामना करतात. सदस्य नियमित बैठक घेतात.बचत करतात. एकमेकांना कर्ज देतात आणि स्थानिक समस्यांवर एकत्र मिळून काम करतात. या ग्रुप्सचे ७०% वृद्ध पूर्णपणे स्वावलंबी झाले आहेत.
लखपती वृध्द
गटातील प्रत्येक वृद्धाकडे १.१९ लाख रु. जमा झाले. सुपौलमध्ये वृद्ध दरमहा प्रत्येकी ५० रुपये जमा करतात. १५ वर्षांत गटाने आपल्या सदस्यांना २.३३ कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. यातून १३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. आता ग्रुपच्या प्रत्येक सदस्याचा वाटा १.१९ लाख रुपये आहे. लोक त्यांना लखपती वृद्ध म्हणतात. भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयानेही एल्डर सेल्फ हेल्प ग्रुप मॉडेल स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. याला राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानात समाविष्ट केले आहे.
















