प्रयागराज : महाकुंभमधील सर्वात मोठा धार्मिक वाद अखेर टोकाला पोहोचला आहे. ज्योतिषपीठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्यावर टीका करणा-या अभिनेत्री ममता कुलकर्णी (यामाई ममता नंद गिरी) हिची किन्नर आखाड्यातून हकालपट्टी करण्यात आली आहे. आखाड्याच्या प्रमुख आचार्य महामंडलेश्वर डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी एका व्हीडीओ संदेशाद्वारे या निर्णयाची अधिकृत पुष्टी केली.
त्रिपाठी म्हणाल्या की आखाड्याच्या सर्व पदाधिका-यांसोबत बैठक घेऊन आम्ही हा निर्णय घेतला आहे. आता ममता कुलकर्णीशी आखाड्याचा कोणताही संबंध नाही. ती आता आखाड्याची अधिकारी किंवा सदस्य नाही. आमच्या आखाड्यात महिला, पुरुष आणि किन्नर सर्व आहेत. आम्हाला कोणताही वाद नको आहे. तसेच मौनी अमावस्येच्या दिवशी ज्या प्रकारे बटुक ब्राम्हणांना शिखा धरून मारहाण झाली, त्याबद्दलही आमची तीव्र नाराजी आहे.
ममता कुलकर्णीचा वादग्रस्त दावा
२५ जानेवारी रोजी ममता कुलकर्णीने शंकराचार्य वादावर बोलताना खळबळजनक विधान केले होते. ती म्हणाली होती की १० पैकी ९ महामंडलेश्वर आणि तथाकथित शंकराचार्य खोटे आहेत आणि त्यांना शून्य ज्ञान आहे. याशिवाय तिने शंकराचार्यांना दोन रोखठोक प्रश्न विचारले होते. यामध्ये त्यांची शंकराचार्यपदी नियुक्ती कोणी केली? व कोट्यवधींच्या गर्दीत पालखी घेऊन निघण्याची काय गरज होती? यावरून ही कारवाई झाली आहे.
माझी हकालपट्टी नाही, तर मी राजीनामा दिला
आखाड्यातून काढल्याच्या वृत्तावर ममता कुलकर्णीने वेगळाच दावा केला आहे. ती म्हणाली, मी महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिला आहे. खरे तर महामंडलेश्वर पद हे अनेक वर्षांच्या आध्यात्मिक तपस्येतून मिळते. मी पाहिले की, खरा महंत किंवा महामंडलेश्वर होण्यासाठी अनेक वर्ष ध्यान आणि शिस्तीतून जावे लागते.

