नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने आपल्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि पारदर्शक करण्यासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. १९८६ पासून कार्यरत असलेली ४० वर्षे जुनी पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टम आता पूर्णपणे बदलली जाणार असून ऑगस्ट २०२६ पासून रेल्वे गाड्या नव्या अत्याधुनिक सिस्टमवर शिफ्ट केल्या जातील. खुद्द रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचा आढावा घेतला आहे.
नव्या रिझर्व्हेशन सिस्टममध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करण्यात आला आहे. आधी वेटिंग तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता वर्तवण्याची अचूकता केवळ ५३% होती, ती आता ९४% वर पोहोचली आहे. आता प्रवाशांना तिकीट बुक करतानाच समजेल की, त्यांच्या प्रवासापर्यंत सीट कन्फर्म होण्याची शक्यता किती आहे. यामुळे प्रवाशांचा गोंधळ कमी होईल.
रेल वन अॅपची तुफान लोकप्रियता
रेल्वेने गेल्या वर्षी जुलैमध्ये लाँच केलेले फे्रंडली अॅप अल्पावधीतच लोकप्रिय झाले आहे. एका वर्षापेक्षा कमी कालावधीत या अॅपने ३.५ कोटी डाऊनलोड्सचा टप्पा ओलांडला आहे. या अॅपद्वारे दररोज सुमारे ९.२९ लाख तिकिटांची विक्री होते, ज्यामध्ये ७.२ लाख अनरिझर्व्हड आणि २.०९ लाख रिझर्व्हड तिकिटांचा समावेश आहे.
रेल्वे प्रवासावर ४३% सवलत
रेल्वेने दिलेल्या आकडेवारीनुसार, सरकार प्रवाशांना तिकिटावर मोठी सबसिडी देत आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये रेल्वेने एकूण ६०,२३९ कोटी रुपयांची सवलत दिली आहे. जर रेल्वेला एका प्रवाशासाठी १०० रुपये खर्च येत असेल, तर रेल्वे प्रवाशाकडून केवळ ५७ रुपये वसूल करते. म्हणजेच प्रत्येक प्रवाशाला ४३% डिस्काउंट मिळत आहे.
















