पोळ्याच्या दिवशी झाला होता वाद, दोघांना गाठून काठ्या, कु-हाडीने हल्ला
जालना : पोळ्याच्या दिवशी झालेल्या वादातून शुक्रवारी जालना जिल्ह्यातील पानशेंद्रा गावात सकाळी दोन तरुणांची जमावाने निर्घृण हत्या केली. राहुल बोर्डे आणि प्रदीप बोर्डे असे हत्या झालेल्या तरुणांची नावे आहेत. या घटनेने गावात वातावरण तणावाचे असून, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे.
जालना शहरापासून जवळच असलेल्या पानशेंद्रा गावात पोळ्याच्या दिवशी राहुल गौतम बोर्डे आणि गावातील काही जणांसोबत वाद होऊन हाणामारी झाली होती. त्या प्रकरणात तालुका जालना पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी राहुल बोर्डे (२५) आणि त्याचा भाऊ प्रदीप बोर्डे (२३) या दोघा भावांना १० ते १५ जणांच्या जमावाने गाठले. त्यांच्यावर काठ्या, कु-हाडी आणि लोखंडी सळ्यांनी हल्ला केला. यामध्ये राहुल बोर्डे हा जागीच ठार झाला, तर प्रदीप हा गंभीर जखमी झाला. मृत राहुल आणि जखमी तरुणाला जिल्हा रुग्णालयात तात्काळ नेण्यात आले. घटनेची माहिती कळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्यासह तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय लोहकरे यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा गावात तैनात करण्यात आला आहे. संशयित आरोपींच्या शोधासाठी पोलिस पथके तैनात करण्यात आली आहेत.
दरम्यान, या घटनेत गंभीर जखमी झालेल्या प्रदीप गौतम बोर्डे याचाही जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित १५ जणांना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती समजते, तर हल्ल्यात आणखी एक जण जखमी आहे. तो जमावाच्या तावडीतून सुटला असून, तो बेपत्ता आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरातच बसून काम करत असल्याने जनतेमध्ये नाराजी : संदीप देशपांडे