औरंगाबाद : जून महिन्यात पाठ फिरवणा-या पावसाने जुलैच्या सुरुवातीपासून मराठवाड्यात हाहाकार माजवला आहे. ८ जुलै ते २४ जुलैपर्यंत मराठवाड्यातील १८२ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यामुळे मराठवाड्यात झालेल्या नुकसानीचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून घेतला जाणार आहे.
एकनाथ शिंदे हे ३० जुलै रोजी औरंगाबाद दौ-यावर येणार असून, यादरम्यान ते मराठवाडा विभागाच्या पीकनुकसानीचा आढावा घेणार आहेत.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे शनिवार, ३० जुलै रोजी नांदेड जिल्ह्याच्या अतिवृष्टी व पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. आपल्या दौ-यात ते स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिका-यांकडून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेणार आहेत. दरम्यान राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची तसेच अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी विधिमंडळाचे अधिवेशन त्वरित बोलावण्याची मागणी अजित पवारांनी केली आहे.
असा असणार मुख्यमंत्र्यांचा दौरा…
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच औरंगाबाद दौ-यावर येत आहेत. यावेळी ते सिल्लोड येथे सभा घेणार आहेत. सिल्लोड येथील नगर परिषदेच्या मैदानात ही सभा असणार आहे. तर पोलिसांकडून सुद्धा या मैदानाची पाहणी करण्यात आली आहे. तर याचवेळी शिंदे हे वैजापूर येथे सुद्धा भेट देणार असल्याची माहिती समोर आली आहे.
वैजापूर तालुक्यातील बाजाठाण फाट्यावर नवीन साखर कारखान्याचे उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती आमदार रमेश बोरणारे यांनी दिली आहे. याचवेळी ते मराठवाडा विभागाच्या पीकनुकसानीचा आढावासुद्धा घेणार आहेत.