निपाणी : महत्त्व आणि गरज नसलेल्या गोष्टी जनतेसमोर ठेवल्या जातात. महागाई आणि इतर समस्या झाकून ठेवण्यासाठी इतर गोष्टी केल्या जात असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. सीमाभागातील निपाणीत राष्ट्रवादीचा मेळावा पार पडला. यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी भाजपवर कडाडून हल्लाबोल केला. जयंत पाटील म्हणाले की, काळ बदलला आहे, देशातील परिस्थिती वेगळी आहे.
कर्नाटकात बजरंगबलीचा आधार घेतला होता. आता देशात रामाचा आधार घेतला जात आहे. महत्त्व आणि गरज नसलेल्या गोष्टी जनतेसमोर ठेवल्या जातात. महागाई आणि इतर समस्या झाकून ठेवण्यासाठी इतर गोष्टी केल्या जातात, असा टोलाही त्यांनी लगावला.
ते पुढे म्हणाले की, ज्या पद्धतीने विधानसभा निवडणुकीत उत्साह दिसला होता तोच उत्साह दिसत आहे. या मेळाव्याला मोठ्या संख्येने महिला उपस्थित आहेत. त्यामुळे पुढील निवडणुकीत उत्तम पाटील हे आमदार होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही भाजपवर तोफ डागली.
यावेळी बोलताना त्यांनी इतिहासाची सुद्धा आठवण करून दिली. शरद पवार बोलताना म्हणाले की, मशीद पडल्यानंतर राम मंदिर बांधण्याचा निर्णय राजीव गांधी यांच्या कार्यकाळामध्ये झाला होता. राजीव गांधी यांच्या हस्ते शिलान्यास करण्यात आला. मात्र, आता राम मंदिराचे काम बाजूला राहिले आहे आणि भाजप आणि आरएसएसकडून याचा मतासाठी फायदा करून घेतला जात आहे.
उपवास लोकांची उपासमार घालवण्यासाठी सुद्धा करावा
राम मंदिराच्या कार्यक्रमाचा मी आदर करतो, पण गरिबी घालवण्यासाठी देखील असा कार्यक्रम सरकार हाती घेईल का? अशी विचारणा त्यांनी सरकारकडे केली. पंतप्रधान मोदी करत असलेल्या दहा दिवसांच्या उपवासाचा शरद पवारांनी खोचक शब्दांत समाचार घेतला. ते म्हणाले की, मोदी दहा दिवस उपवास करत आहेत, त्यांनी तसाच उपवास लोकांची उपासमार घालवण्यासाठी सुद्धा करावा अशी टीका त्यांनी केली.