मुंबई : मुंबईतील वांद्रे (पूर्व) रेल्वे स्थानकाजवळील गरीबनगर परिसरात सुरू असलेल्या अतिक्रमणविरोधी कारवाईला २० मे २०२६ रोजी हिंसक वळण लागल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पश्चिम रेल्वे आणि मुंबई महानगरपालिकेकडून अनधिकृत झोपड्यांवर बुलडोझर कारवाई सुरू असताना काही समाजकंटकांनी पोलिसांवर जोरदार दगडफेक केली. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत १५ जणांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गरीबनगर परिसरात रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी प्रशासनाने मोठ्या प्रमाणात मोहीम सुरू केली होती. या कारवाईच्या दुस-या दिवशी काही रहिवासी आणि समाजकंटकांकडून विरोध सुरू झाला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असताना अचानक पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात तीन पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. निर्मलनगर पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या मदतीने दगडफेक करणा-यांची ओळख पटवत १५ जणांना अटक केली. या प्रकरणात आणखी काही संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, अतिक्रमण हटवण्याची कारवाई नियोजनानुसार सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणा-यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे.
















