चेन्नई/नवी दिल्ली: तामिळनाडूच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडली असून, ‘सिंघम’ म्हणून ओळखले जाणारे तामिळनाडू भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी ५ जून २०२६ रोजी त्यांचा राजीनामा अधिकृतपणे मंजूर केला आहे, ज्यामुळे अन्नामलाई आणि भाजपच्या राजकीय वाटा आता कायमच्या वेगळ्या झाल्या आहेत.
के. अन्नामलाई यांनी २ जून २०२६ रोजी आपला राजीनामा पक्षाच्या नेतृत्वाकडे सुपूर्द केला होता. या निर्णयापूर्वी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आणि पक्षाचे सरचिटणीस बी.एल. संतोष यांच्याशी सविस्तर चर्चा केली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षाच्या नेतृत्वाने त्यांना आपला निर्णय मागे घेण्याची विनंती केली होती, परंतु अन्नामलाई आपल्या निर्णयावर ठाम राहिले.
भाजप सोडल्यानंतर आता के. अन्नामलाई काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांनुसार, ते लवकरच एका नवीन राजकीय आंदोलनाची घोषणा करण्याची शक्यता आहे, ज्याचे रूपांतर भविष्यात एका स्वतंत्र प्रादेशिक पक्षात होऊ शकते. अन्नामलाई यांनी याआधीच संकेत दिले होते की, तामिळनाडूमध्ये राष्ट्रीय पक्षांपेक्षा समाजकेंद्रित नवीन राजकीय पर्यायाची गरज आहे.
के. अन्नामलाई यांच्या या निर्णयामागे काही महत्त्वाची कारणे मानली जात आहेत. तामिळनाडू भाजपमधील अंतर्गत समीकरणे आणि एआयएडीएमके सोबतच्या युतीवरून झालेले मतभेद त्यांच्यासाठी अडचणीचे ठरले होते. तसेच केंद्र सरकारच्या काही धोरणांबाबत, विशेषतः तीन भाषा सूत्राबाबत अन्नामलाई आणि राज्यातील राजकीय वातावरणात असलेल्या मतभेदांचा परिणाम त्यांच्या भूमिकेवर झाल्याचे बोलले जात आहे. अन्नामलाई हे सुरुवातीपासूनच आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात आणि पक्षाच्या चौकटीत राहून काम करण्यापेक्षा, ते स्वतःची एक स्वतंत्र राजकीय जमीन तयार करण्याच्या प्रयत्नात असल्याचे समजते.
२०२० मध्ये आयपीएसची नोकरी सोडून राजकारणात आलेल्या अन्नामलाई यांनी अत्यंत कमी काळात तामिळनाडू भाजपमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या राजीनाम्यामुळे तामिळनाडूतील भाजप कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. पक्षासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे, कारण अन्नामलाई हे भाजपचा आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जात होते. आता आगामी काही दिवसांत के. अन्नामलाई आपल्या पुढील वाटचालीबाबत कोणती अधिकृत घोषणा करतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.
















