मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धवसेना आणि मनसे यांच्यात झालेल्या युतीवर उद्धवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हा क्षण महाराष्ट्र आणि मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तसेच मुंबईला हिरवा रंग देण्याचा प्रयत्न केला जातोय, भाजपच्या आरोपावर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली.
युतीबद्दल भाष्य करताना आदित्य ठाकरे म्हणाले की मुंबई आणि महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही जी लढाई लढत आहोत, त्यासाठी सर्वांना एकत्र आणणे ही एक मोठी ताकद आहे. हा केवळ राजकीय निर्णय नसून महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आणि मुंबईकरांच्या भविष्यासाठी उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे.
मुंबईला हिरवा रंग देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप भाजपने केला. यावर उत्तर देताना आदित्य ठाकरे यांनी भाजपच्या विचारसरणीवर टीका केली. ते म्हणाले की भाजप प्रत्येक गोष्टीकडे एका वेगळ्या चष्म्यातून पाहते. पण त्यांनी एक लक्षात ठेवावे की, प्रत्येकाचे रक्त लालच असते. आम्ही इथल्या माणसांसाठी, इथल्या कष्टक-यांसाठी लढत आहोत, कोणत्याही रंगासाठी नाही.
भाजपवर हल्लाबोल करताना आदित्य ठाकरे यांनी थेट सवाल उपस्थित केला. जेव्हा-जेव्हा भाजपला आपला पराभव समोर दिसतो, तेव्हा ते पैसा, जात आणि भाषेच्या मुद्यांवर बोलू लागतात. लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी ते या गोष्टींचा वापर करतात असा आरोप त्यांनी केला. तसेच, भाजपने या देशात दुसरे काय ठोस काम केले आहे? हे त्यांनी एकदा जनतेला दाखवून द्यावे असेही ते म्हणाले.

