मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या मतदानासाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज झाली आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी एकूण १ कोटी ७ लाख ३ हजार ५७६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी सुमारे १३ हजार ३५५ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. आता मतदान प्रक्रियेत बदल करण्यात आला असून, सकाळी ७.३० पासून सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे.
या निवडणुकांसाठी ईव्हीएम मशीनची व्यवस्था करण्यात आली असून त्यात १३ हजार ७२६ कंट्रोल युनिट आणि २७ हजार ४५२ बॅलेट युनिटची उपलब्धता करण्यात आली आहे. राज्यातील २४६ नगरपरिषदा तर ४२ नगरपंचायतींच्या (एकूण २८८) सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. २ डिसेंबरला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदानाची वेळ असणार आहे तर मतमोजणी ३ डिसेंबरला सकाळी १० वाजेपासून सुरु होणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार यादीतील संभाव्य दुबार मतदाराच्या नावासमोर (**) असे डबल स्टार चिन्ह नमूद करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्याच्या नावासमोर ते चिन्ह आहे त्याने कुठे मतदान करणार आहोत, याची माहिती देणे आवश्यक आहे. अशा मतदाराने एका ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला तर दुस-या ठिकाणी तशी माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे दोन ठिकाणी त्याला मतदान करता येणार नाही, याची खबरदारी निवडणूक आयोगाने यावेळी घेतली आहे.

