नवी दिल्ली : काँग्रेसने १४ जानेवारीपासून सुरू होणा-या भारत न्याय यात्रेचे नाव बदलले आहे. आता याचे नाव भारत जोडो न्याय यात्रा असे असेल. गुरुवार दि. ४ जानेवारी रोजी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात झालेल्या पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह पक्षाचे सर्व सरचिटणीस, प्रदेश प्रभारी, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते उपस्थित होते. यात्रेची तयारी आणि लोकसभा निवडणुकीची रणनीती यावर बैठकीत चर्चा झाली. खरगे म्हणाले- बैठकीचा अजेंडा २०२४ च्या लोकसभा निवडणुका जिंकणे आणि भारत जोडो न्याय यात्रेच्या तयारीशी संबंधित आहे. दोन्हीचे यश आमच्यासाठी महत्त्वाचे आहे, त्यासाठी आम्हाला वेळ द्यावा लागेल. तुम्ही लोक पक्षाचे डोळे आणि कान आहात, असे खरगे म्हणाले. आता आमच्याकडे फक्त तीन महिने आहेत, ज्यामध्ये आम्हाला एक टीम म्हणून पक्षासाठी रात्रंदिवस मेहनत करावी लागणार आहे. यासोबतच त्यांनी पक्षश्रेष्ठींना आपसातील मतभेद मीडियात वाढवू नयेत, असा सल्ला दिला.
या बैठकीत काँग्रेस अध्यक्षांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही जोरदार निशाणा साधला. खरगे म्हणाले की, पंतप्रधानांनी आजपर्यंत मणिपूरला भेट दिली नाही, यावरून ते राष्ट्रीय प्रश्नांवर किती बेजबाबदारपणे वागतात हे दिसून येते. भाजपने गेल्या १० वर्षात एकही काम केले नाही ज्याला यश मानता येईल. यूपीए-काँग्रेसच्या काळातील योजनांचे नाव आणि स्वरूप बदलण्याचे काम ते करत आहेत. सरकार पीएसयू आणि मोठ्या संस्था विकत आहे. देशाच्या जीवनवाहिनी रेल्वेसह प्रत्येक संस्था उद्ध्वस्त झाली आहे. आज सरकार ईडी, सीबीआय आणि आयटीसारख्या संस्थांचा उघडपणे गैरवापर करत आहे.
डिसेंबर २०२३ मध्ये पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षात फेरबदल केले. यानंतर नवनियुक्त सरचिटणीस आणि प्रदेश प्रभारींसोबत पक्ष नेतृत्वाची ही पहिलीच बैठक आहे. दिल्लीत होणा-या या बैठकीपूर्वी काँग्रेस नेतृत्वाने राज्यातील नेत्यांच्या स्वतंत्र बैठका घेतल्या असून, त्यात निवडणुकीच्या तयारीसाठी रणनीती आखण्यात आली आहे.
१४ जानेवारीपासून यात्रा
काँग्रेस खासदार राहुल गांधी १४ जानेवारीपासून भारत जोडो न्याय यात्रा सुरू करणार आहेत. ही यात्रा मणिपूरपासून सुरू होऊन २० मार्चला मुंबईत संपेल. लोकसभा निवडणुकीच्या सुमारे ४ महिने आधी निघणा-या या यात्रेत १४ राज्ये आणि ८५ जिल्ह्यांचा समावेश असेल. या काळात राहुल पायी आणि बसने ६ हजार २०० किलोमीटरहून अधिक अंतर कापतील.
वेणुगोपाल यांची माहिती
काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल आणि जयराम रमेश यांनी २७ डिसेंबर रोजी पक्षाच्या मुख्यालयात भारत न्याय यात्रेची माहिती मीडियाला दिली होती. भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेस भारत न्याय यात्रा काढणार असल्याचे पक्षाच्या नेत्यांनी सांगितले. ती मणिपूरपासून सुरू होऊन नागालँड, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातमधून जाईल आणि महाराष्ट्रात संपेल.
खरगे यात्रेला हिरवा झेंडा दाखविणार
वेणुगोपाल यांनी सांगितले होते की, पक्षाचे अध्यक्ष खरगे या यात्रेला हिरवा झेंडा दाखवतील. आर्थिक, सामाजिक आणि राजकीय न्याय हा भारत न्याय यात्रेचा उद्देश आहे. यादरम्यान राहुल तरुण, महिला आणि उपेक्षित लोकांना भेटतील. बस प्रवासाच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल. प्रवासातील काही छोटे भाग मधून मधून पायी कव्हर केले जातील.