मुंबई : मुंबईतील क्रिकेट मैदानावर एक मोठी दुर्घटना घडली आहे. क्रिकेट सामना खेळत असताना एका ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. मैदानावर दोन सामने सुरू असल्याने हा अपघात झाला. दुस-या सामन्यातील चेंडू जयेश सावला नावाच्या व्यक्तीच्या डोक्याला लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
सोमवारी दुपारी माटुंगा येथील दादरकर मैदानावर एकाच वेळी दोन सामने सुरू होते. दोन्ही सामने एकाच टी-२० स्पर्धेतील होते. ५० वर्षांवरील लोकांसाठी ही स्पर्धा होती. कुटची विसा ओखल विकास लिजंड कप असे या स्पर्धेचे नाव आहे.
या मैदानावर नेहमीच अनेक सामने एकाच वेळी खेळले जातात, त्यामुळे अनेक खेळाडू जखमी होत असल्याच्या बातम्या येत होत्या. अशा अपघातात एखाद्याचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
जयेश सावलाला मागून चेंडू लागला आणि तो तिथेच पडला, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. लायन ताराचंद रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिका-यांनी सांगितले की, सावला यांना सायंकाळी पाचच्या सुमारास मृत अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले. त्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या अपघातात कोणत्याही प्रकारचा कट किंवा घातपात असण्याची शक्यता नसल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.