जीनिव्हा : डब्ल्यूएचओने काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक आणि युगांडातील उद्रेकाची गंभीर दखल घेत इबोला आजाराला ‘आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी’ म्हणून अधिकृतपणे घोषित केले आहे. आरोग्य संघटनेच्या या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध प्रतिक्रिया उमटल्या असून, भारत सरकारनेही प्रवासाबाबत खबरदारीची नियमावली (ट्रॅव्हल अॅडव्हायझरी) जारी केली आहे. हा उद्रेक इबोला विषाणूच्या दूर्मिळ ‘बुंदिबुग्यो’ स्ट्रेनमुळे झाला आहे, ज्यावर सध्या कोणतेही मान्यताप्राप्त लस किंवा उपचार उपलब्ध नाहीत.
काँगोच्या तीन प्रांतांमध्ये ८६७ संशयित रुग्णांपैकी २०४ मृत्यूंची नोंद झाली आहे. २०१४ ते २०१६ मधील पश्चिम आफ्रिकेतील साथीनंतरचा हा इतिहासातील दुसरा सर्वात मोठा इबोला उद्रेक ठरला आहे. या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर, काँगो आणि युगांडाच्या सीमांना लागून असलेल्या दक्षिण सुदानसह इतर शेजारील देशांमध्ये संसर्ग पसरण्याचा धोका सर्वाधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.
भारताकडून ट्रॅव्हल अॅडव्हायझरी जारी
भारत सरकारने एका अधिसूचनेद्वारे सर्व भारतीय नागरिकांना पुढील आदेश येईपर्यंत काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदानचा अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, सध्या या देशांमध्ये राहणा-या किंवा प्रवास करणा-या भारतीय नागरिकांना स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सार्वजनिक आरोग्य मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याचा आणि अतिरिक्त खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. भारतात आतापर्यंत बुंदिबुग्यो विषाणूच्या स्ट्रेनमुळे होणा-या इबोला आजाराचे एकही रुग्ण आढळलेले नाही.
प्रवासाद्वारे इबोला भारतात येऊ शकतो का?
इबोलाचा उद्रेक सामान्यत: आफ्रिकेच्या काही भागांपुरताच मर्यादित असतो, परंतु आंतरराष्ट्रीय प्रवासामुळे कधीकधी संक्रमित व्यक्ती इतर देशांच्या सीमा ओलांडून प्रवास करू शकतात. त्यामुळे, जगभरातील विमानतळ, रुग्णालये आणि आरोग्य अधिकारी आता कडक तपासणी आणि विलगीकरण (आयसोलेशन) नियमांचे पालन करत आहेत. भारताने यापूर्वीही इबोला उद्रेकादरम्यान विमानतळांवरील पाळत आणि तपासणी अधिक कडक केली होती. तज्ज्ञांच्या मते, भारतात इबोलाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होण्याचा धोका कमी आहे, कारण हा विषाणू कोविड-१९ प्रमाणे हवेतून पसरत नाही.
















