जळकोट (ओंकार सोनटक्के) : खरीप हंगामाची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात असतानाच, राज्यातील शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी चिंतेची बातमी समोर आली आहे. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी ‘महाराष्ट्र फर्टीलायझर्स पेस्टीसाइड, सीडस् डीलर्स असोसिएशन’ने (माफदा) पुकारलेल्या राज्यव्यापी बेमुदत बंदला आज, २७ एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. जळकोट आणि जांब बुद्रुक येथील विक्रेत्यांनी या संपाला सक्रिय पाठिंबा दिल्याने ग्रामीण भागातील खत आणि बियाणे विक्री ठप्प झाली आहे.
विक्रेत्यांनी सरकारसमोर १४ प्रमुख मागण्या मांडल्या आहेत, ज्यामध्ये कंपन्यांकडून खतांचा पुरवठा करताना इतर अनावश्यक उत्पादने (लिंकिंग) विक्रेत्यांच्या माथी मारणे थांबवावे. अवैध एचटीबीटी (HTBT) बियाण्यांच्या तस्करीवर कठोरपणे आळा घालण्यात यावा. ‘साथी’ पोर्टल ॲप वापरण्याची सक्ती केवळ किरकोळ विक्रेत्यांवर न ठेवता ती उत्पादक आणि पुरवठादार कंपन्यांच्या स्तरावर लागू करावी. बियाण्यांचे नमुने निकृष्ट (Fail) आढळल्यास विक्रेत्यांना थेट ‘आरोपी’ न करता ‘साक्षीदार’ म्हणून वागणूक द्यावी. गुणवत्ता तपासणीसाठी प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या नमुन्यांची अनेक वर्षांपासूनची थकीत रक्कम त्वरित अदा करावी.
या संदर्भात विक्रेत्यांनी जिल्हाधिकारी, विभागीय कृषी सहसंचालक आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना वारंवार निवेदने दिली आहेत. मात्र, शासनाकडून केवळ आश्वासने मिळत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये मोठा असंतोष आहे. “आम्ही वारंवार विनंत्या करूनही शासन ठोस निर्णय घेत नाही. जोपर्यंत आमच्या तक्रारींचे आठ दिवसांत निवारण होत नाही, तोपर्यंत हा बंद सुरूच राहील,” असा पवित्रा संघटनेने घेतला आहे.

