शिर्डी : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता येथे ह्रदय पिळवून टाकणारी घटना घडली असून एकाच कुटुंबातील ५ जणांनी आपले जीवन संपवले आहे. विशेष म्हणजे, वडिलांनी आपल्या लहान मुलांसह विहिरीत उडी घेत आत्महत्या केली आहे. एका शेताच्या बाहेर दुचाकी लावल्याचेही पाहायला मिळाले. बायको नांदायला येत नाही म्हणून बापाने आपल्या ४ अपत्यांसह जीवन संपवल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली.राहाता तालुक्यातील को-हाळे शिवारात निर्दयी बापाने मुलांना विहिरीत ढकलून स्वत: आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. अरुण काळे (३०) राहणार चिखली कोरेगाव, तालुका श्रीगोंदा असे बापाचे नाव आहे.
अरुण काळेने आपली एक मुलगी आणि तीन मुलांसह विहिरी उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अद्यापही दोन जणांचा विहिरीत शोध सुरू आहे. एक हात आणि एक पाय दोरीने बांधलेल्या अवस्थेत विहिरीत अरुण काळे यांचा मृतदेह आढळला असून स्वत: हात पाय बांधून आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवानी अरुण काळे (८), प्रेम अरुण काळे (७), वीर अरुण काळे (६), कबीर अरुण काळे (५) अशी मृतांची नावे आहेत. कौटुंबिक वादा-वादीमुळे बायको ८ दिवसांपूर्वीच येवला येथे माहेरी गेली होती.

