नवी दिल्ली, वृत्तसंस्था
भारतीय लष्कराने ‘अग्नीवीर’ भरती प्रक्रियेत बदल करण्याचा निर्णय घेतला. आता अग्निवीर भरती प्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये होणार आहे. त्यानुसार अग्निवीर होण्यासाठी पहिल्या टप्प्यात सीईई-प्रवेश परीक्षा द्यावी लागेल. या प्रक्रियेचा खर्च कमी व्हावा, या उद्देशाने अग्निवीरच्या पहिल्या टप्प्यात सीईई चाचणी होईल. दुस-या टप्प्यात शारीरिक चाचणी आणि तिस-या टप्प्यात वैद्यकीय चाचणी होर्ईल.
देशात २०० केंद्रांवर सीईर्ई
अग्निवीरच्या नवीन भरती प्रक्रियेअंतर्गत, भरतीसाठी परीक्षा म्हणजेच, सामाईक प्रवेश परीक्षा ऑनलाईन होईल. यासाठी ६० मिनिटे म्हणजेच, एक तासाचा वेळ दिला जाईल. यासाठी उमेदवारांना परीक्षा केंद्रावर जावे लागेल. एप्रिल २०२३ मध्ये होणा-या सीईईसाठी २०० परीक्षा केंद्रे असतील. परीक्षेनंतर गुणवत्ता यादी जारी होईल.
परीक्षेनंतर शारीरिक चाचणी
सीईई परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांची शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी होईल. दुस-या टप्प्यांतर्गत शारीरिक चाचणीमध्ये महिला आणि पुरुष दोघांसाठीचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. महिला उमेदवारांना आठ मिनिटांत १.६ चा रनिंनग स्पेल पार करावा लागेल. उमेदवारांना १५ सिट-अपसह १० सिट-अप पूर्ण करावे लागतील. तर, पुरुषांना ६.३० मिनिटांत १.६ किमी धावावे लागेल. त्यानंतर २० सिट-अप आणि १२ पुश-अप करावे लागतील. यामध्ये यशस्वी उमेदवार तिस-या टप्प्यातील परीक्षेसाठी पात्र ठरतील.
शेवटच्या टप्प्यात वैद्यकीय चाचणी
पहिल्या आणि दुस-या टप्प्यातील चाचणीत पात्र उमेदवारांसाठी वैद्यकीय चाचणी ही शेवटची फेरी असेल. यामध्ये सैन्य दलाने घालून दिलेल्या नियमांनुसार, प्रकृती आणि शारीरिक तंदुरुस्ती योग्य असल्यास उमेदवारांना अग्निवीर बनण्याची संधी मिळेल.
काय होती जुनी भरती प्रक्रिया?
भारतीय सैन्यात अग्निवीर भरतीसाठी जुन्या प्रक्रियेत सीईई ऐवजी प्रथम शारीरिक चाचणी उत्तीर्ण होणे आवश्यक होते. यानंतर वैद्यकीय चाचणी घेण्यात येई आणि शेवटच्या फेरीत परीक्षा घेतली जायची. अग्निवीर सैन्य भरती प्रक्रियेवर उलटसुलट चर्चा झाली. गेल्या वर्षी भारतीय सैन्यात ४०, ००० अग्निवीरांची भरती झाली होती. सध्या त्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. सुमारे १० हजार अग्निवीरांना ४ वर्षांनंतर स्थायी कमिशन मिळणार आहे.