नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जंगलात नैसर्गिक व मनुष्यनिर्मित कारणांमुळे पेटणा-या वणव्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर हानी होते. यात लाख मोलाच्या वन्य जीवांसोबतच दुर्मिळ अशी जैवविविधताही भस्मसात होते. त्यामुळे हे नुकसान टाळण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने(एनडीआरएफ) पहिल्यांदाच जवानांना सर्वसमावेशक प्रशिक्षण देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे.
देशभरात विविध आपत्तींचा मुकाबला करण्यात महत्त्वाची भूमिका निभावणारी ही ‘एनडीआरएफ’ची टीम आता पर्यावरणाच्या रक्षणासाठीही सरसावली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘एनडीआरएफ’च्या तीन तुकड्यांना सहा फेब्रुवारीपासून जंगलातील वणवे आटोक्यात आणण्याचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाईल, अशी माहिती एनडीआरएफचे महासंचालक अतुल कारवाल यांनी दिली. दलाच्या १८ व्या स्थापना दिनानिमित्त केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या उपस्थितीत त्यांनी याची घोषणा केली.
कारवाल म्हणाले, या प्रशिक्षणासाठी एनडीआरएफ पर्यावरण व वन मंत्रालयाशी सातत्याने संपर्कात होते. भविष्यात देशात एनडीआरएफसाठी आणखी आठ प्रादेशिक प्रतिसाद दलांचीही (आरआरसी) स्थापना केली जाईल. त्या त्या राज्यातील भौगोलिक परिस्थितीनुसार ही पथके काम करतील.
हवामानाच्या असंतुलनावर लक्ष
जंगलात भडकणारे वणवे हे केवळ वनसंपदेपुरते मर्यादित नसतात. या वणव्यांमुळे वन्यजीव, पशू- पशी, सरटपणा-या प्राण्यांच्या प्रजातीही जशा नष्ट होतात. तसेच पर्यावरणाचे संतुलन राखणारी जैवविविधताही नष्ट होते. पर्यावरणाची ही साखळी वाचविण्यासाठी ‘एनडीआरएफ’ ने आता एक पाऊ पुढे टाकले आहे.
वणव्यांचा समावेश नैसर्गिक आपत्ती यादीत
नैसर्गिक आपत्तीत प्रतिसाद देणा-या या दलाला वणवे आटोक्यात आणण्याचे प्रशिक्षण दिले जात नसल्याबद्दल संसदीय समितीने देखील चिंता व्यक्त केली होती. सोबतच वणव्यांचा समावेश नैसर्ग्कि आपत्तीच्या यादीत करावा, अशी शिफारसही संसदीय समितीने केली होती. त्याची दखल घेत एनडीआरएफच्या दलाने वणवे नियंत्रणाच्या प्रशिक्षणाचा समावेश केला आहे.
राज्यांत तुकड्यांना जागा
या प्रशिक्षणासाठी एनडीआरएफ दलाला उत्तराखंडमधील हल्दवानी आणि चेन्नईत ६५ एकर देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सध्या देशात एनडीआरएफच्या १६ तुकड्या तैनात असून त्यासाठी १८०० जवान सेवेत आहेत.