मुंबई : एसटीच्या मोडक्या, तुटक्या व भंगार बसवर राज्य शासनाच्या जाहिराती प्रसिद्ध केल्याप्रकरणी भूम एसटी आगाराच्या कनिष्ठ कर्मचा-यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. हे म्हणजे ‘रोग हाल्याला, इंजेक्शन पखालीला….’ असा प्रकार असल्याची जोरदार टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. तसेच, संबंधित कर्मचा-यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी अजित पवारांनी केली आहे.
अजित पवार यांनी राज्यपालांच्या अभिभाषण प्रस्तावावर बोलताना, मुख्यमंत्र्यांचा फोटो असलेली राज्य शासनाची जाहिरात भंगार, तुटक्या, फुटक्या एसटी बसवर लावण्यात आल्याचे छायाचित्र दाखवले होते. ‘‘राज्य शासनाकडून सुरू असलेली जाहिरातींवरची उधळपट्टी कमी व्हावी आणि तो निधी एसटीच्या सुधारणांसाठी, कर्मचा-यांच्या हितासाठी खर्च व्हावा, अशी अपेक्षा होती. परंतु, तसे काही घडले नाही,’’ अशी खंत अजित पवार यांनी व्यक्त केली होती.
या जाहिरातीनंतर भंगार एसटीची सुधारणा करण्याऐवजी उलट, सरकारने भूम एसटी आगाराचे वाहन परीक्षक डी. बी. एडके, एस. एन. हराळ, ए. यू. शेख या तिघांना निलंबित केले. खिडक्या नसणारी ‘एसटी बस फेरीसाठी बाहेर’ काढण्यास कारणीभूत असल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवला. सरकारचा हा निर्णय म्हणजे ‘रोग हाल्याला, इंजेक्शन पखालीला ’, अशी टीका अजित पवारांनी केली आहे.
एसटी बसेसची दुरवस्था
‘‘राज्यात फक्त एकाच एसटी बसची दुरवस्था झालेली नाही. अशा हजारो नादुरुस्त, मोडक्या, तुटक्या बस रस्त्यावर धावत आहेत. त्या चालवणा-या सगळ्याच कर्मचा-यांना तुम्ही निलंबित करणार का? अशा पद्धतीने सर्वच कर्मचा-यांना निलंबित करावे लागेल. एकही एसटी बस रस्त्यावर धावू शकणार नाही. त्यातून ग्रामीण जनतेची गैरसोयच होणार आहे,’’ असे अजित पवारांनी सांगितले.
‘‘या प्रकरणात निलंबित एसटी कर्मचा-यांचा काही दोष नाही. त्यांचे निलंबन तातडीने मागे घेण्यात यावे. त्याप्रमाणेच, सरकारने एसटीच्या ताफ्यात असलेल्या बसगाड्यांच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करावे. मुख्यमंत्र्यांनी जाहिरातबाजीला आळा घालावा. जाहिरातींवरचा कोट्यवधीचा खर्च टाळून, एसटीचे आधुनिकीकरण, विकासकामांसाठी तो निधी वापरावा’’, अशी मागणी अजित पवारांनी केली.
एसटीचा वापर विकासासाठी झाला पाहिजे
कारवाई करायचीच असेल तर, ज्यांनी शासनात बसून जाहिरातीचे कंत्राट काढले, ज्यांनी मोडक्या एसटीवर जाहिरात दिली. मोडक्या एसटीवर जाहिरात दिल्याचे लक्षात येऊनही पैशांचा अपव्यय होऊ दिला, त्यांच्यावर कारवाई करावी. एसटी महामंडळ आणि एसटीची प्रवासी सेवा, हा महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास आहे. ग्रामीण, दुर्गम भागात आजही एसटी हीच प्रवासाचे साधन आहे. एसटीचा वापर राजकारणासाठी न करता, महाराष्ट्राच्या विकासासाठी झाला पाहिजे, अशी अपेक्षाही अजित पवारांनी व्यक्त केली.