संशयास्पद भूमिकेमुळे जोर का झटका
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्य विधिमंडळात शिवसेनेला धक्का बसला. त्यानंतर शिवसेनेने संसदीय राजकारणाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, लोकसभेतील शिवसेनेच्या प्रतोद भावना गवळी यांची उचलबांगडी केली. शिंदे यांच्या बंडानंतर खा. गवळी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून गवळी यांनी शिंदे यांची भूमिका योग्य असल्याचे म्हटले होते. दरम्यान, नवे प्रतोद म्हणून राजन विचारे यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आमदारांचा मोठा गट पक्षातून फुटून निघाल्यानंतर शिंदेंनी भरत गोगावले यांची पक्षाच्या प्रतोदपदी नियुक्ती केली. यामुळे शिवसेनेला विधानसभेत बहुमत चाचणीवेळी आणि अध्यक्ष निवडणुकीवेळी मोठ्या पेचप्रसंगाचा सामना करावा लागला. या पार्श्वभूमीवर आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीआधी शिवसेनेने मोठा निर्णय घेतला आहे.
शिवसेनेच्या लोकसभेतील प्रतोद भावना गवळी यांची उचलबांगडी करत खासदार राजन विचारे यांची पक्षाच्या लोकसभा प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांना पाठवलेले पत्र सध्या व्हायरल होत आहे. राज्यात राजकीय घडामोडी सुरू होण्याआधी भावना गवळी ईडीच्या रडारवर होत्या. त्यांना ईडीकडून नोटीसदेखील बजावण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपसोबत जायला अनुकूलता दर्शवली होती. तसेच पक्षप्रमुखांना पत्र लिहून आग्रहही धरला होता.
‘त्या’ पत्रामुळे संशय वाढला
दोन आठवड्यांपूर्वी एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांच्या बंडखोरीनंतर भावना गवळी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शिंदे गटाच्या कलाने निर्णय घेण्याची विनंती केली होती. ही भूमिका कितीही कठीण असली तरी शिवसैनिकांसाठी निर्णय घ्यावा, ही विनंती, अशा आशयाचे पत्र गवळी यांनी उद्धव ठाकरेंना लिहिले होते. त्यामुळे संशय वाढला होता.
आनंदराव आडसूळ यांचा राजीनामा
अमरावतीचे माजी खासदार आणि शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी आपल्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. ईडी चौकशी प्रकरणात आणि आपल्या आजारपणाच्या काळात ठाकरे कुटुंबियांनी साधी आपली चौकशी केली नसल्याची खंत व्यक्त करत त्यांनी आपल्या नेतेपदाचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाने शिवसेनेला जोरदार हादरे बसले आहेत. आता अडसूळ यांनीही बंडाचे निशाण फडकवल्याने ठाकरेंची डोकेदुखी वाढली आहे. याशिवाय इतर जिल्ह्यांतही गळती लागली आहे.