भाजपला ठाकरे-सेनेचे नाते संपवायचेय : ठाकरे
मुंबई : ज्यांना शेंदूर लावला, ते शिवसेना गिळायला निघाले आहेत. त्यांना भाजपची साथ आहे, भाजपला अंदाज नाही कोणत्या शक्तीसोबत पंगा घेतला आहे, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला. भाजपला ठाकरे आणि शिवसेना हे नाते संपवाचे आहे. याआधी अनेकदा शिवसेना फोडण्याचा प्रयत्न झाला. पण आता शिवसेना संपवण्याचा डाव आखला आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
गद्दारांना कुठल्या ना कुठल्या पक्षात जाण्याशिवाय पर्याय नाही, असे अनेक तज्ज्ञ सांगतात. काल त्यांना एका पक्षाने ऑफर दिली आहे, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला. किती वादळ आले, तरी शिवसेनेची पाळंमुळं घट्ट आहे आहेत. जे गेले त्यांचे कोणत्या भाषेत वर्णन करायचे. काल त्यांनी आम्हाला गद्दार बोलू नका, अशी विनंती केली. हे आम्ही नाही, त्यांनी त्यांच्या कपाळावर टिक्का लावून घेतला आहे. जे गेले त्यांच्या बरोबर एकही शिवसैनिक गेला नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. अजय चौधरी यांना विधिमंडळाचे गटनेता केले आहे, असेही यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
२०१९ मध्ये सर्व समसमान ठरले होते. पण त्यानंतर जागा तर कमी दिल्याच. पण जे ठरले होते, त्याबाबत नाही म्हणाले. त्यावेळी त्यांनी अपक्ष आमदारांना साथ देत शिवसेनेच्या जागा पाडल्या. अडीच-अडीच वर्ष सत्ता द्या म्हटले होते, तेव्हा नाही म्हणाले. मग आता कसे जमले. हे आधीच झाले असते तर सन्मानाने झाले असते. मनावर दगड ठेवून करायची गरज नव्हती, असा टोमणाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.
गेले बरेच दिवस अरविंद सावंत कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी बोलवत होते. पण मी दुर्लक्ष करत होतो. पण आता दुर्लक्ष करून चालणार नाही. आमदार-खासदार म्हणतात ते ऐकावे लागतेच, असे हल्ली दिवस आहेत, असा खोचक टोमणा उद्धव ठाकरे यांनी लगावला. मुंबईतील शिवडी येथील शिवसेना शाखेचे उद्घाटन करण्यासाठी उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी शिवसेनेकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. अरविंद सावंत, सुभाष देसाई, सचिन अहिर, किशोरी पेडणेकर यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती दर्शवली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. शिवसेना शिवडी विधानसभा येथे शिवसेना खासदारअरविंद सावंत यांच्या शिवसेना शाखा क्रमांक २०५ याचे नूतनीकरण झाले. त्याचे लोकार्पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले.