मुंबई : ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना मोठा धक्का बसला आहे. मालेगावमधील वेगवेगळ्या दोन पोलिस ठाण्यांमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्यासह एकूण ३२ जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. यामध्ये हिरे कुटुंबातील काही व्यक्तींचा समावेश असल्याने या गुन्ह्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्याविरोधात उभे केल्यानंतर ही कारवाई झाल्यानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. हिरे कुटुंबियांच्या अडचणीत वाढ झाल्याने मालेगावसह नाशिक जिल्ह्यात गुन्हा कोणत्या कारणावरून दाखल झाला याबाबतच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात होत आहेत.
महात्मा गांधी विद्यामंदिर आणि आदिवासी सेवा समितीमध्ये नोकरी लावून देण्याच्या प्रकरणावरून गेल्या आठवड्यात फसवणूक झालेल्या तरुणांनी आंदोलन केले होते. त्यावरून पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर लगेच रेणुकादेवी यंत्रमाग औद्योगिक संस्था यामध्ये सुमारे ३२ कोटींची जिल्हा बँकेची दिशाभूल केल्याप्रकरणी जिल्हा बँकेच्या अधिका-यांनी पोलिसांत फिर्याद दिली होती त्यावरून दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकूणच दोन्ही गुन्हे पाहता हिरे कुटुंबियांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मालेगाव शहरातील दोन पोलिस ठाण्यांत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांची सभा झाली त्यानंतर अद्वय हिरे यांची राजकीय ताकद वाढली होती. त्यामुळे त्यांच्यावर हे गुन्हे दाखल करण्यात आल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
अशातच भाजपला जय महाराष्ट्र करत त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर अद्वय हिरे यांना उपनेते पदही देण्यात आले होते. त्यानंतर शिवसेनेचे दादा भुसे यांच्या विरोधात आगामी काळात निवडणूक लढवण्याची तयारी केल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे.
अद्वय हिरे यांचा ठाकरे गटात प्रवेश आणि मालेगाव पोलिस ठाण्यात दोन ठिकाणी गुन्हा दाखल झाला आहे यामुळे अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. जिल्हा बँकेने इतके दिवस का कारवाई केली नाही? असा सवालही उपस्थित केला जात आहे.