मुंबई : विधिमंडळातील बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्रावरून वाद पेटण्याची शक्यता आहे. तैलचित्रावरून ठाकरे गटाच्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. तैलचित्र अजून चांगले बनवता आले असते असे म्हणत ठाकरे गटाने तैलचित्रावर आक्षेप घेतला आहे. ठाकरे गटाचे आमदार सभापती, विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिणार असल्याची माहिती समोर येत आहे.
बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातले एक मोठे नाव आहे. राजकाराणात असून देखील नेहमीच रिमोट कंट्रोलच्या भूमिकेत बाळासाहेब दिसले. त्यांनी स्वत: शेकडो आमदार-खासदार सभागृहात पाठवले पण स्वत: विधिमंडळाच्या राजकारणात सक्रिय सहभाग घेतला नाही. मात्र राजकारणातल्या उल्लेखनीय कामकाजाचा गौरव म्हणून त्यांचे तैलचित्र विधिमंडळात लावण्यात येणार आहे.
२३ जानेवारीला स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्ताने विधिमंडळात तैलचित्र लावण्यात येणार आहे. राजकारणात सध्या परिस्थिती बदललेली आहे. एकेकाळी एकत्र असणारे नेते उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आता वेगळे झाले आहेत. गेल्या सहा महिन्यांत एकदाही हे दोन्ही नेते एकत्र दिसले नाहीत, मुख्यमंत्रि पदावरून पायउतार केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याबद्दल ठाकरेंच्या मनात प्रचंड नाराजी आहे.
या कार्यक्रमानिमित्त उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदेंसोबत एकाच मंचावर दिसणार अशी चर्चा आहे. बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही पक्षांसाठी महत्त्वाचे आहेत, एक बाळासाहेबांचे रक्ताचे वारसदार आहेत तर दुसरीकडे आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार असल्याचे सांगत सत्ता स्थापन केलेले एकनाथ शिंदे आहेत. या दोघांसाठी बाळासाहेब ठाकरे हा विषय संवेदनशील झाला आहे,
बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा झेंडा घेत शिंदेंनी वेगळी चूल मांडली पण आता त्याच बाळासाहेबांच्या तैलचित्राच्या निमित्ताने दोघेही एकत्र दिसण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील अधिकृत निमंत्रण विधिमंडळाकडून सर्वच पक्षांच्या प्रमुखांना देण्यात येणार आहे त्यामुळे सध्या चर्चा हीच आहे की बाळासाहेबांच्या कार्यक्रमानिमित्ताने उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंच्या सेनेसोबत एकत्र दिसणार का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.