पुणे : नथुराम गोडसे जेवढे वाचाल तेवढे त्यांचे भक्त व्हाल, गांधींचे विरोधक व्हाल. त्यांनी जे केले ते योग्यच होते, असे वादग्रस्त वक्तव्य कालीचरण महाराज यांनी नुकतेच कोल्हापूर येथे केले.
तसेच, शिर्डीचे साईबाबा हे संत होऊ शकतात, फकीर होऊ शकतात. मात्र, देव होऊ शकत नाहीत, असे वादग्रस्त वक्तव्य बागेश्वर बाबा यांनी केले होते. या दोन्ही वक्तव्यांचा तीव्र निषेध राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. तसेच, यावरून त्यांनी भाजपवरही निशाणा साधला आहे.
रोहित पवार यांनी ट्वीट करून या दोन्ही बाबांच्या वक्तव्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ट्वीटमध्ये रोहित पवार यांनी म्हटले आहे की, श्री साईबाबा आणि महात्मा गांधी यांच्याबाबत दोन भोंदू बाबांनी केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध. पण, यानिमित्ताने महाराष्ट्रात होऊ घातलेल्या निवडणुका कोणत्या दिशेला नेण्यात येत आहेत, याचा अंदाज येऊ लागला आहे.
भाजपचे नाव न घेता रोहित पवार म्हणाले, भोंदू बाबांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गांधी नष्ट करण्याचे कुणी कितीही प्रयत्न केले तरी ते नष्ट होऊ शकत नाहीत. जगात गांधी विचार अजरामर आहे. पण हे विचार संपवण्याचा एका मोठ्या राजकीय पक्षाचा प्रयत्न आहे. त्यामुळे हिम्मत असेल तर भोंदूंच्या आडून ट्रायल घेण्यापेक्षा अधिकृत भूमिका घेण्याचे धाडस त्यांनी दाखवावे.
मुख्य प्रश्नांवरून लक्ष वळवण्याचा प्रयत्न
पुढे रोहित पवार म्हणाले की, निवडणुका जवळ आल्या की तथाकथित बाबा-बुवा या भोंदू लोकांना पुढे करून वादग्रस्त विधाने करायला लावायची, जाती-जातीत, धर्मा-धर्मात वाद निर्माण करायचा आणि नॉन इश्यूवर चर्चा घडवून मुख्य प्रश्नांवरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवायचे आणि आपली राजकीय भाकरी भाजायची, हे या पक्षाचे पहिल्यापासूनच धोरण राहिले आहे.