एकाच दिवशी ३ सुवर्ण, रवीकुमार दहिया, विनेश फोगट, नवीन कुमारची कमाल
बर्मिंगहॅम : भारतीय कुस्तीपटू रवी दहियाने पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत त्याने नायजेरियाच्या एबिकेवेनिमो वेल्सनचा पराभव केला. २०२२ राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण जिंकणारा तो चौथा भारतीय कुस्तीपटू ठरला. त्यापाठोपाठ महिला कुस्तीपटू विनेश फोगटने ५३ किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले, तर नवीनकुमार मलिकने भारताला कुस्तीत ६ वे सुवर्णपदक मिळवून दिले. त्याने ७४ किलो वजनी गटात पाकिस्तानच्या मोहम्मद शरीफ ताहिरचा ९-० असा पराभव केला. राष्ट्रकुल स्पर्धेतील भारताचे हे 33 वे पदक आहे.
दुखापतीमुळे ४ वर्षांपूर्वी रवीकुमार दहिया गोल्ड कोस्ट येथे खेळू शकला नव्हता. त्यामुळे आजचे पदक हे त्याचे राष्ट्रकुल स्पर्धेतील पहिलेच पदक ठरले आहे. रवी आणि विनेशने कुस्तीतील अनुक्रमे चौथे आणि पाचवे सुवर्णपदक जिंकले. यापूर्वी ५ ऑगस्ट रोजी बजरंग पुनिया (६५ किलो), दीपक पुनिया (८६ किलो) आणि साक्षी मलिक (६२ किलो) यांनी सुवर्णपदक पटकावले होते, तर अंशू मलिकला (५७ किलो) रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते.
उपांत्यपूर्व फेरीत न्यूझीलंडच्या सूरज सिंगवर सहज विजय मिळवून रवीने आपल्या राष्ट्रकुल मोहिमेला सुरुवात केली होती. उपांत्य फेरीत रवीला पाकिस्तानच्या अली असदचे कठीण आव्हान होते. परंतु रवीने १४-४ गुणांच्या फरकासह विजय मिळवला. हरियाणातील सोनीपतमधील नहारी गावात जन्मलेला रवी दहिया सध्या दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या सरकारमध्ये शिक्षण संचालक आहे.
विनेशची पदकांची हॅट्ट्रीक
विनेश फोगटने महिलांच्या फ्रीस्टाइल ५३ किलो वजनी गटात श्रीलंकेच्या चामोदा केशनी मदुरावालेज डॉनचा पराभव केला. विनेशने २०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून पदकांची हॅट्ट्रीक केली आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सलग तीन पदकांची कमाई करणारी ती पहिला भारतीय कुस्तीपटू ठरली आहे. याशिवाय राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.
पूजा गेहलोतला कांस्य
भारताच्या पूजा गेहलोतने स्कॉटलँडच्या ख्रिस्टलेचा १२-२ असा पराभव करत महिला ५० किलो फ्रीस्टाईलमध्ये कांस्य पदक पटकावले. कुस्तीमधून भारताला मिळालेले हे दुसरे कांस्य पदक आहे. दिल्लीची पूजा ही पहिल्यांदाच राष्ट्रकुल स्पर्धेत खेळत होती. भारताने कुस्तीत आतापर्यंत ४ सुवर्ण, १ रौप्य आणि ३ कांस्य अशी एकूण ११ पदके पटकवाली आहेत.
एकूण ३३ पदकांची कमाई
राष्ट्रकुलमध्ये भारताने आतापर्यंत ३३ पदके जिंकली आहेत. यामध्ये १२ सुवर्ण, ११ रौप्य आणि १० कांस्य पदकांचा समावेश आहे.