कोल्हापूर : भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आपल्या बेधडक मत व्यक्त करण्यामुळे कायमच चर्चेत असतात. आपल्या वक्तव्याचे काय पडसाद उमटतील याबद्दल ते कधीच विचार करत नाहीत. आत्ताही त्यांनी राजकारणातील राजकारणात निवृत्तीचे वय असावे असे म्हटले आहे. तरुणांना केव्हा संधी मिळणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
तरुणांनी राजकारणात यावे असे राजकीय नेते आवाहन करीत असतात. यासंदर्भात स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायतीत त्यामुळेच सातत्याने परिवर्तन झालेले दिसते. त्यात तरुणांना संधी मिळते. मात्र मुख्य प्रवाहात प्रस्थापित नेतेच महत्त्वाच्या पदांवर विराजमान असतात, ही सत्य परिस्थिती आहे असेही उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.
तर महाराष्ट्राचे मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाला. त्याबाबत प्रतिक्रिया देताना उदयनराजे म्हणाले की, राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच अन्य राष्ट्रपुरुषांबाबत आक्षेपार्ह व्यक्तव्ये केली होती. तर पुढे बोलताना ते म्हणाले की, राजकारणात निवृत्तीचे वय असावे. माझा काही कुणाशी व्यक्तिद्वेष नाही. मात्र त्यांचे वय बघता त्यांच्याकडून हे अपेक्षित नव्हते. त्यामुळे आता राजकारणात देखील निवृत्तीचे वय ठरले पाहिजे असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.
पुढे ते म्हणाले की, आपण नेहमी म्हणतो की, तरुणांना वाव दिला पाहिजे. ऐन उमेदीतील वर्षे प्रतीक्षा करण्यात जातात हे समजून घेतले पाहिजे. राज्यपाल या पदावर अनुभव असलेले, पण वय जास्त नसलेल्या व्यक्तींचा नियुक्तीविषयी विचार करावा.