मुंबई : आमच्या विरोधात जो बोलेल त्याच्यावर कारवाई करू, अशा इंग्रजांनी आणलेल्या धोरणाची अंमलबजावणी भाजप सरकार करत असल्याचे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर झालेली कारवाई नवीन नाही. ही दबाव व त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी कारवाई सुरू असल्याचे पटोले म्हणाले.
अजून किती लोकांना जेलमध्ये टाकायचे हे त्यांनी ठरवावे. परंतु, भारतातील लोकशाहीला ते सोप्या पद्धतीने हलवू शकणार नाहीत. येणा-या निवडणुकीत जनता भाजपला त्यांची जागा दाखवेल यात दुमत नसल्याचे पटोले यावेळी म्हणाले.
मूळ विषयाला डायव्हर्ट करण्यात भाजप एक्सपर्ट
नाना पटोले हे अहमदनगर जिल्ह्याच्या दौ-यावर आहेत. या दौ-यावर असताना प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना पटोलेंनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. आपले पाप लपवण्यासाठी अशी कारवाई करणे हे नवीन नाही. अग्निपथ योजनेतील तरुणांचा उद्रेक वाढल्यानंतर लगेच ईडी कार्यालयात बोलवून वातावरण बदलले गेले.
मूळ विषयाला डायव्हर्ट करण्यात भाजप एक्सपर्ट असल्याचे पटोले यावेळी म्हणाले. राज्यपालांनी जो खंजीर महाराष्ट्राच्या पाठीत खुपसला, जो घाव केला. त्याला जनता कधीही विसरणार नाही. राज्यपालांनी भाजप कार्यालय उघडले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल, असेही पटोले यावेळी म्हणाले.
भाजपचे कटकारस्थान जनतेला समजले
आता भाजपचे कटकारस्थान जनतेला कळायला लागले आहे. धनुष्यबाण गोठविण्याचे काम आता ते करणार आहेत. एका पार्टीला संपवून आम्ही कसे जिवंत राहू, अशा पद्धतीचे घाणेरडे राजकारण ७५ वर्षांत कोणी केले नाही. हे खालच्या पातळीचे व लोकशाहीला घातक राजकरण केंद्रातील भाजप सरकार करत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी यावेळी केला.
केंद्र सरकारच्या देश विकण्याच्या धोरणाच्या, केंद्र सरकारच्या विरोधात जो कोणी बोलेल, त्याच्या विरोधात आम्ही केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून कारवाई करू, असे धोरण भाजपचे असल्याचे पटोले म्हणाले. त्यामुळे ही करावाई नवीन नाही. ही दबावासाठी कारवाई सुरू असल्याचे पटोले म्हणाले.