मुंबई : राष्ट्रवादीचे नेते माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतक-यांचे झालेले प्रचंड नुकसान, शिंदे सरकार फाळ कार टिकणार नाही, राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न अशा अनेक विषयांवर दिलीप वळसे पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
ते म्हणाले की, राज्यात अवकाळी पावसामुळे शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तरी देखील राज्य सरकारकडून नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत, कर्मचा-यांच्या संपाचे कारण सांगून पंचनामे झालेले नाहीत असे सांगितले जाते. सर्व सरकारी यंत्रणा ठप्प आहे. लवकर पंचनामे करून शेतक-यांना मदत मिळावी यासाठी प्रयत्न करणार असून याबाबत विधानसभेत आवाज उठवणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान होत असताना कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना गांभीर्य नाही. केंद्र सरकारच्या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचल्या जात नाहीत, सरकार फक्त राजकारण करण्यात व्यस्त आहे, असा आरोप वळसे पाटलांनी केला आहे.
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सगळं अलबेल नाही. हे सरकार फार काळ टिकेल असे वाटत नाही. सरकार जोपर्यंत चालेल तोपर्यंतच चालेल. एक दिवस सरकार पडेल. भाजप-शिंदे गटातील आमदारांच्या मनातील भावना जरा अवघड दिसत आहेत, असे वळसे पाटलांनी सांगितले.