मुंबई : शिवसेनेचे (शिंदे गट) नेते संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सवाल उपस्थित केले आहेत. संबंधित लोकप्रतिनिधी हे सरकारमधील पक्षाचे असल्यामुळे त्यांना पाठिशी घालत आहे का?
असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला विचारला आहे. तसेच त्यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही हे अतिशय खेदजनक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याची तात्काळ दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
याबाबत सुप्रिया सुळे यांनी ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेंशन केले आहे. महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये, विनयभंग अथवा सायबर क्राईमच्या तक्रारींवर तातडीने कारवाई करणे अतिशय गरजेचे आहे. अन्यथा हे सरकार महिलांबाबत असंवेदनशील असल्याचा संदेश जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.
आमदार संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘छत्रपती संभाजीनगर येथील आमदार संजय शिरसाट यांनी दोन-तीन दिवसांपूर्वी सुषमा अंधारे यांच्याबाबत बोलताना उधळलेली मुक्ताफळे ही समस्त महिला वर्गाला अपमानित करणारी आहेत. संबंधित लोकप्रतिनिधी हे सरकार पक्षाचे आहेत म्हणून सरकार त्यांना पाठिशी घालत आहे का? त्यांच्यावर अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही हे अतिशय खेदजनक आहे.
अनेक महापुरुषांचा वैचारिक वारसा असणारे महाराष्ट्र हे अत्यंत सभ्य, सुसंस्कृत राज्य आहे. हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. ज्या शिवरायांनी परस्त्री ही मातेसमान मानली, त्या शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलांचा अवमान होतो ही खेदाची बाब आहे. राजकारणात कितीही तीव्र विरोध असला तरीही महिलांबद्दल बोलताना कायमच इथल्या राजकीय धुरिणांनी सुसंस्कृतपणाचा आब राखलेला आहे.