आता आपण राजकारण कधी सोडतो, असे वाटतेय : गडकरी
नागपूर : गेल्या काही वर्षांपासून राजकारणाचा स्तर घसरत चालला आहे. ग्रापंचायतपासून खासदार होण्यापर्यंत पाण्यासारखा पैसा ओतला जात आहे. मतदार ते आमदार, खासदार फोडण्यासाठी घोडेबाजार होत आहे. राज्यात संत्तांतरातही घोडेबाजार झाल्याचे आरोप होत आहे. यावर खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात सध्याचे राजकारण १०० टक्के सत्ताकारण बनले असल्याचे सांगत थेट राजकारण सोडण्याची भाषा केली. बदलत्या परिस्थितीत कधी कधी आपण राजकारण कधी सोडतो, असे वाटायला लागत असल्याचे म्हटले.
ज्येष्ठ समाजसेवक गिरीश गांधी यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमानिमित्त नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सध्या राजकारण या शब्दाचा अर्थ समजून घ्यायची वेळ आली आहे. राजकारण हे समाजकारण आहे, राष्ट्रकारण आहे, विकासकारण आहे की सत्ताकारण? याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रश्न उपस्थित केले. महात्मा गांधी यांच्या काळात राजकारण हे समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण होते. आता मात्र राजकारण हे शंभर टक्के सत्ताकारण झाले आहे. त्यामुळे कधी कधी आपण राजकारण कधी सोडतो असे वाटायला लागले, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाषणातून व्यक्त केले.
यावेळी त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक गिरीश गांधी यांच्या कार्याचा गौरव केला. राजकारण सोडून अनेक गोष्टी केल्या जावू शकतात. हे गिरीश गांधी यांनी दाखवून दिल्याचे गडकरी यांनी सांगितले. पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून गिरीश गांधी यांचे मोलाचे कार्य आहे. गिरीश गांधी यांचे काम सुरू असताना आम्ही त्यांचे विद्यार्थी असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.