२०६३ पदे भरली जाणार : मुख्यमंत्री
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्यात आल्याची घोषणा केली. स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयात २०६३ पदे भरली जाणार आहेत. शिवाय यासाठी ११४३ कोटी रुपये राज्य सरकारने दिले आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आज जागतिक दिव्यांग दिन आहे. स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय असले पाहिजे, अशी आपली सगळ््यांची भावना होती. हे राज्य सर्वसामान्यांच्या हितासाठी सुरू झाले आहे. या राज्यात लोकांच्या हिताचेच निर्णय होणार आहेत. आज दिव्यांगासाठी सोन्याचा दिवस आहे. आपले सरकार आल्यानंतर तुम्हाला दिव्यांग मागण्यांसाठी आंदोलन करावे लागले नाही. राज्यात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाची आज मी घोषणा करत आहे, असे शिंदे म्हणाले.
या स्वतंत्र मंत्रालयासाठी २०६३ पदे निर्माण होतील, तसेच सेक्रेटरी दर्जाचा अधिकारी यासाठी असेल. तुमच्या कल्याणासाठी जे जे आवश्यक आहे, ते सगळे हे मंत्रालय करेल. कुठलेही धोरण ठरवताना आता दिव्यांगांचे मतसुद्धा जाणून घेतले जाईल. हा निर्णय फक्त २४ दिवसांत झाला आहे. बाळासाहेब ठाकरे यांनासुद्धा दिव्यांगांबद्दल तळमळ होती. केंद्र सरकार, नरेंद्र मोदी यांनी आश्वस्त केले आहे की, या मंत्रालयासाठी कुठेही पैसे कमी पडणार नाहीत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
ज्यांनी आयुष्यभर रोखीने व्यवहार केला त्यांना खोक्याशिवाय काय दिसणार, असंही ते म्हणाले. या दिव्यांगचा प्रेम ज्यांना मिळेल, त्यांना प्रेरणा मिळेल. मात्र ज्यांना त्यांचा शाप मिळेल त्याला काय मिळेल, असा सवालही त्यांनी केला. तसेच आंदोलनात सामील झालेल्या दिव्यांगवरील गुन्हे आम्ही मागे घेण्यासंदर्भात गृह विभागाशी बोलतो, असेही ते म्हणाले.