मुंबई : शिवसेनेतून बंड करून बाहेर पडलेल्या शिंदे गटातील एकूण ३आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे काही आमदार आमच्या पक्षाच्या म्हणजेच राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.
दरम्यान एकनाथ शिंदे आणि ४० समर्थक आमदार यांनी शिवसेनेत बंड केले आणि भाजपसोबत जात नवीन सरकार स्थापन केले. यानंतर शिवसेनेत फुट पडून दोन गट निर्माण झाले. त्यानंतर शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्र आले आणि सरकार स्थापन केले. यानंतर इतर पक्षातील आमदार, खासदार, मंत्री, नेते, कार्यकर्ते हे पक्षांतर करू लागले. यामध्ये जास्त तर शिवसेनेच्या ठाकरे गटाला मोठे खिंडार पडल्याचे दिसून आलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला जात नसल्यामुळे आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. शिंदे गटातील तीन आमदार व भारतीय जनता पक्षाचे काही आमदार आमच्या पक्षाच्या संपर्कात आहेत, तर हिवाळी अधिवेशनापूर्वीच त्यांची राष्ट्रवादीत येण्याची इच्छा असल्याचेही अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. ते दौंड शहरात पत्रकारांशी बोलत होते.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा त्यांच्या आमदारांवर विश्वास असता तर हिवाळी अधिवेशनापूर्वी विस्तार केला असता. विस्ताराच्या दिवशी सरकार कोसळेल. आमच्या म्हणजे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संपर्कात असलेले शिंदे गटातील तीन आमदार हे विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र मधील आहेत. भाजपचे काही आमदार संपर्कात आहेत पण आकडा आता सांगणार नाही असंही अमोल मिटकरी म्हणाले आहेत. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.