अहमदपूर/पालम : तालुक्यातील उजना येथील सिद्धी शुगर कारखान्यावर ऊस तोड कामगार म्हणून पालम तालुक्यातील ११ ऊस तोड कामगार उजना परिसरामध्ये ऊसतोड करण्यासाठी आले असता उजना शिवारातील पांडुरंग परतवाघ यांच्या शेतात गेल्या आठ दिवसांपासून ऊस तोडणीचे काम चालू होते. कारखाना बंद होण्यासाठी काही दिवस शिल्लक असल्याने पिण्याचे पाणी आणण्यासाठी व कपडे धुण्यासाठी ऊसतोड कामगार महिला गेले असता एक महिला पाय घसरून तलावात पडली असताना तिला वाचवण्यासाठी आई धावली, आई बुडत असल्याचे पाहून दुसरी मुलगी तलावात उतरली व तिही बुडू लागली ते पाहून दोन नातेवाईक महिलाही त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरले असता एकमेकाला वाचविण्याच्या प्रयत्नात पाच जणी बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी ८.३० वाजता घडली. याबाबत किनगाव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
उजना येथील सिद्धी शुगर कारखाना सुरु झाल्यापासून पालम तालुक्यातील ऊस तोड कामगार ऊस तोडणीसाठी आले होते. कारखाना बंद होण्यासाठी काही दिवस शिल्लक असल्याने त्यांना गावाकड जाण्याचे वेध लागले होते. शनिवारी सकाळी राधाबाई धोंडीबा आडे वय ४५, दीक्षा धोंडिबा आडे वय २१, काजल धोंडिबा आडे वय १९ वर्षे सर्व रा. रामापूर तांडा, तालुका पालम जिल्हा परभणी व सुषमा संजय राठोड वय २२, अरुणा गंगाधर राठोड वय २६, रा मोजमाबाद तांडा ता.पालम. जि परभणी येथील हे ऊसतोड कामगार असून कारखान्या शेजारीच तुळशीराम तांडा तलाव आहे या तलावावरून पिण्याचे पाणी आणण्यासाठी तसेच कपडे धुण्यासाठी गेले असता ही दुर्दैवी घटना घडलीÞ अहमदपूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाचही मृतदेहाची उत्तरीय तपासणी करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
पालम तालुक्यावर शोककळा
पालम तालुक्यातील रामापूर तांडा व पिराचा तांडा या दोन गावातील उस तोडीसाठी गेलेल्या ३ मायलेकी व २ बहिणी अशा ५ जणीचा अहमदपूर तालुक्यातील तुळशीराम तांडा पाझर तलावात धुणे धुण्यासाठी गेल्या असता पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना असून त्यामुळे दोन्ही गावावर शोककळा पसरली असून स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे.