औरंगाबाद : औरंगाबादच्य म्हाडा कॉलनी परिसरात एका तरुणीचा भर रस्त्यात विनयभंग करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. कंपनीत नोकरी करणारी युवती ऑफिसला जाताना बसमध्ये चढताच एका ३० वर्षीय तरुणाने भर रस्त्यात ‘मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, माझ्याशी शारीरिक संबंध ठेव’ असे म्हणत बसमधून खाली ओढून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आलाय.
ही घटना ३० डिसेंबर रोजी म्हाडा कॉलनी परिसरातील रोजगार कार्यालयाजवळ घडली. तर सतीश मधुकरराव आठवले (वय ३०, रा. दिघी, ता. कारंजा, जि. वाशिम, सध्या रा. औरंगाबाद) असे त्या आरोपीचे नाव आहे. तसेच आरोपी सतीश विरोधात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी हे एकाच गावचे रहिवासी आहेत. पीडिता ही कुटुंबांसह शहरात राहत असून शेंद्रा एमआयडीसी येथे एका खासगी कंपनीत काम करते. दरम्यान नेहमीप्रमाणे ती आपल्या कामानिमित्ताने ऑफिसला जाण्यासाठी रोजगार कार्यालयाजवळ थांबली होती.
यावेळी आलेल्या कंपनीच्या बसमध्ये बसण्यासाठी चढत असतानाच आरोपी सतीश आठवले तिथे पोहचला. पीडीत तरुणी बसमध्ये चढत असतानाच तिचा हात पकडून तिला खाली ओढले.
तसेच मला तुझ्याशी लग्न करायचे असून, माझ्याशी शारीरिक संबंध ठेव’ असे म्हणत विनयभंग केला. इतकेच नव्हे तर दुस-या कोणाशी लग्न केले तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने पोलिसात धाव घेत आठवलेविरोधात तक्रार दिली असून, त्यानुसार मुकंदवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.