मुंबई : रत्नागिरीतील बारसू येथे सौदी अरेबियातील इस्लामिक ऑईल रिफायनरी कंपनीकडून प्रकल्प उभारला जात आहे. म्हणजेच इस्लामिक ऑईल रिफायनरीसाठी रत्नागिरीतील स्थानिकांना, हिंदूंना निर्घृण मारहाण केली जात आहे. हेच या सरकारचे हिंदुत्व, अशा शब्दांत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
इस्लामिक रिफायनरीसाठी हिंदूंवर अत्याचार केले जात आहेत, हा कोणता न्याय आहे? शिंदे-फडणवीस सरकारचे हे कोणते हिंदुत्व आहे?, असा सवाल संजय राऊत यांनी केला.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी प्रकल्प राज्याच्या हिताचा असेल तर स्थानिकांची नाराजी दूर केली पाहिजे, असे म्हणत प्रकल्पाबाबत मवाळ भूमिका घेतली आहे.
तर, उद्धव ठाकरे यांनी प्रकल्पाविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे बारसूवरून राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे गटात मतभेद असल्याचे दिसत आहे. यावर संजय राऊत म्हणाले की, अजित पवार व ठाकरे गटात कोणतेही मतभेद नाहीत. तसेच, उद्धव ठाकरेंनी आदेश आणि सूचना दिल्या की महाविकास आघाडीतील मतमतांतरे संपवून टाकू.
उद्धव ठाकरेंचाच निर्णय अंतिम
ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनीदेखील प्रकल्पाला समर्थन देणारी भूमिका घेतली आहे. यावर संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांची भूमिका हीच पक्षाची भूमिका आहे. ठाकरे गटाचे सर्व आमदार पक्षाच्या निर्णयाला बांधील आहेत. आमदारांमध्ये काही मतभिन्नता असेल तर आम्ही सर्वजण पक्षप्रमुखांशी चर्चा करतो आणि उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील, तो मान्य करतो. आताही आम्ही तसेच करू.