हेक्टरी १५ हजार, ५ लाख शेतक-यांना लाभ मिळणार
मुंबई : राज्यातील धान उत्पादक शेतक-यांना प्रती हेक्टरी १५ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्यासाठी १ हजार कोटी रुपयांच्या अतिरिक्त खर्चाला आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयाचा अंदाजे ५ लाख शेतक-यांना लाभ होणार आहे.
विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धान उत्पादकांना मदत देण्याची घोषणा केली होती. २०२२-२३ या खरीप पणन हंगामात केंद्र शासनाने मंजूर केलेल्या हमी भावाव्यतिरिक्त नोंदणीकृत शेतक-यांना धान लागवडीखालील जमिनीनुसार प्रती हेक्टरी १५ हजार रुपये या प्रमाणे दोन हेक्टरपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येईल. २०२१-२२ खरीप हंगामात १ कोटी ३३ लाख ७९ हजार ८९२ क्विंटल धान खरेदी झाली होती. पण या हंगामात धानाकरिता प्रोत्साहनपर रक्कम जाहीर करण्यात आली नव्हती.
या पूर्वीच्या खरीप हंगामामध्ये धान उत्पादकांना प्रतीकिं्वंटल ७०० रुपये अशी रक्कम प्रोत्साहनपर म्हणून देण्यात आली आहे. मात्र, ही रक्कम प्रती क्विंटल देण्यात येत असल्यामुळे काही अडचणी येत होत्या. ज्या शेतक-यांकडे ५० क्विंटलपेक्षा कमी धान उत्पादन आहे, अशांच्या नावे ५० क्विंटल मर्यादेपर्यंत जास्तीची धान खरेदी करण्याचे प्रकार घडले. तसेच शेजारील राज्याचे धान महाराष्ट्रात विक्रीसाठी आणल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. यंदा २०२२-२३ योजनेकरिता सुमारे ५ लाख शेतक-यांनी नोंदणी केली असून एकूण ६ लाख हेक्टरपेक्षा जास्त जमिनीवर धान उत्पादन झाले आहे.